![]()
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. पुणे कृषी महाविद्यालयाच्या ३८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी कृषी विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता आणि नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. हा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार, १३ रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषीचे माजी सचिव नानासाहेब पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे आणि अनिल महामुलकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच, प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख आणि सचिन भालिंगे यांना ‘कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कृषीमंत्री भरणे यांनी ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मॉन्सूनबाबत सकारात्मक संकेत दिल्याचे सांगितले. चांगल्या पावसावर शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबून असून, योग्य पर्जन्यमान झाल्यास पीक उत्पादन आणि फळबागांची वाढ साध्य होते, असे त्यांनी नमूद केले. पावसाअभावी होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानीवरही त्यांनी प्रकाश टाकला. कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करताना, भरणे यांनी कृषी शिक्षणाची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडावी, असे ते म्हणाले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून विविध महत्त्वाच्या पदांपर्यंतचा आपला प्रवास संधी आणि कर्तृत्वाच्या बळावर घडल्याचे त्यांनी सांगितले. दिवंगत नेते अजित पवार यांनी व्यक्तीमधील गुण ओळखून संधी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात सुरू असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या ५५-५६ वर्षांत विद्यापीठाने ३२० पेक्षा अधिक पिकांचे सुधारित वाण आणि ५५ नवीन कृषी यंत्रे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
Source link
एआयने शेतीला नवी दिशा, उत्पादन वाढ शक्य:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुणे कृषी महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी आवाहन