![]()
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन महत्त्वाची चर्चा केली. काँग्रेसबद्दल जे काही वक्तव्य झाले, त्याबद्दल रोहितने दिलगिरी व्यक्त केली आहे. काही चूक-भूल झाली असेल तर माफ करा, अशी विनंती रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार का नाही हे दोन-4 तासात समजेलच, असेही त्यांनी म्हटले आहे. पार्थ पवारांच्या विधानावर पत्रकारांनी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की,आत्या म्हणून मला पार्थला जे काही सांगायचे आहे, ते मी घरात सांगेन. अशा गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात. रोहित पवारांनी या प्रकरणी मध्यस्थी करत दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे आता काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. FIR का नोंदवला गेला नाही? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सर्वात जास्त पाठपुरावा घेण्याचे योगदान हे रोहित पवारांचे आहे. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा संसदेत मांडला. आम्ही सर्वांनी दोन्हीकडे हा मुद्दा मांडला. आम्हाला वाटले होते तशी चर्चा यावर झाली नाही. रोहित पवारांनी मांडलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की आम्ही करू. अजित पवार हे या राज्याचे उपमुख्यमंत्री होते पण काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात या प्रकरणी FIR केला. म्हणजे काँग्रेससोबत अजित पवारांनी अनेक वर्षे काम केले. दादा गेल्यानंतर रोहित पवार यांना FIR दाखल करण्यासाठी काँग्रेसच्या सरकारकडे जावे लागले. पण अजित पवार ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारने FIR नोंदवण्यास नकार का दिला हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहे. सुळेंचे ट्विट काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागली आहे.यापूर्वी अजितदादांनी कॉंग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणे ही अजितदादांना आदरांजली ठरेल. तरी माझी कॉंग्रेस पक्षाला नम्र विनंती आहे की कृपया आपण आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी.
दमानियांच्या आरोपांची नोंद घ्यावी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अंजली दमानिया एक जबाबदार भारतीय आहेत. त्या सातत्याने चुकीच्या होणाऱ्या गोष्टीवर आवाज उठवताना दिसतात. त्या न घाबरता पारदर्शकपणे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर मांडत आलेल्या आहेत. दमानियांनी जी माहिती माध्यमांसमोर मांडली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. अंजली दमानियांनी सर्व माहिती सरकारला द्यावी आणि महाराष्ट्र सरकारने त्यांची नोंद घेतली पाहिजे. दुसऱ्या कामात व्यस्त होते सुनेत्रा पवार यांनी काल हर्षवर्धन सपकाळ यांना काल फोन केल्यावरून बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, देशावर सध्या मोठे आर्थिक संकट आहे. जागतिक युद्धाचे सावट जरी कमी झाले असले, तरी पेट्रोल-डिझेलचे दर आणि वाढती महागाई सामान्य माणसाचे कंबरडे मोडत आहे. मी या प्रश्नांवर काम करण्यात व्यस्त असल्याने बारामतीच्या निवडणुकीकडे माझे लक्ष नव्हते. प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे राजकारणासोबतच सुळे यांनी स्थानिक प्रश्नांवरही प्रशासनाला धारेवर धरले. शहरात नालेसफाईसाठी मोठा निधी दिला जातो, पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. नाल्यांवर रस्ते आणि इमारतींचे अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबते. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी मदतीची हाक अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, यासाठी सुप्रिया सुळे यांनी आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
Source link