Headlines

धनंजय मुंडेंना मंत्री केले, तर सत्ता जाणार:करुणा मुंडेंचा महायुतीला इशारा; ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी, एकनाथ शिंदेंना टोला




आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले तर महायुतीची सत्ता जाईल आणि तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही, असा इशारा धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनाच या महाराष्ट्रात न्याय मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत करुणा यांनी यावेळी आपण दादांना न्याय मिळवून देण्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याचेही जोर देऊन सांगितले. सत्ताधारी शिवसेनेचे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. करुणा मुंडे शर्मा या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी महायुतीला उपरोक्त इशारा दिला. त्या म्हणाल्या, वंजारी समाजाने आमदार धनंजय मुंडे यांना नाकारले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्री केल्यास त्यांना मंत्री करणाऱ्या पक्षाची सत्ता जाईल. त्यानंतर तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही. हा एका स्त्रीचा शब्द आहे. धनंजय यांनी स्वतःच्या बायकोला तुरुंगात डांबले. अनेक लोकांना जेलमध्ये टाकले. अशा 1000 लोकांची माझ्याकडे यादी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांना पुन्हा मंत्री केले तर मी मंत्रालयापुढे आंदोलन करेन. अजित पवारांना न्याय देण्यासाठी पोटनिवडणुकीत उडी करुणा मुंडे यांनी यावेळी आपण बारामतीची पोटनिवडणूक का लढवत आहोत? हे ही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मी बारामतीची पोटनिवडणूक अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवत आहे. कारण, अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. सुनेत्रा पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांनी एफआयआर दाखल केला नाही. या महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय मिळाला नाही, मग सर्वसामान्यांचे काय? एवढे दिवस झाले, पण हा घात होता अपघात हा मुद्दा कुणीही उचलला नाही. काँग्रेसने या निवडणुकीत आपला डमी उमेदवार उभा केला. नंतर माघार घेतली. मलाही खूप काही ऑफर आल्या. अनेक नेत्यांचे फोन आले. खासदार पार्थ पवार यांचाही फोन आला. पण मी माघार घेतली नाही. माझा विजय झाला तर सर्वप्रथम मी अजित पवारांच्या अपघाताचा एफआयआर दाखल करण्यासाठी लढा देईन. महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय भेटणार नसेल, तर कुणाला भेटणार? असे करुणा म्हणाल्या. ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी करुणा मुंडे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांकडे काम घेऊन गेले की, ते दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर निघून जातात. त्यामुळे जनतेने मला संधी दिली, तर मी त्या संधीचे 100 टक्के सोने करेल. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप व ट्रिपल इंजिन सरकार केवळ धूर काढणारे इंजिन आहे. हे सरकार लोकांना ईडी, सीडी व कुठेतरी अडकवण्याची भीती दाखवून आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करते. ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी आहे. रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईवरही भाष्य या लोकांनी रवींद्र वायकर यांच्या घरी ईडी पाठवली होती. मध्यरात्री 2 वाजेपासून ईडीचे लोक त्यांना त्रास देत होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने मला ही गोष्ट सांगितली. रवींद्र वायकर यांनी मला घेऊन चला, पण मी शिवसेना सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. ईडीचे लोक रवींद्र वायकर यांच्या पत्नीलाही घेऊन जाणार होते. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला, असे करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या. दरम्यान, भोंदू अशोक खरातच्या टोळीला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करुणा मुंडे यांनी यावेळी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *