![]()
बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांना सल्ला देण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले. मात्र, या विषयावर अंतिम निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसने अजून अंतिम भूमिका जाहीर केलेली नसली तरी पक्षामध्ये विचारमंथन सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आपली भूमिका केवळ सल्ल्यापुरती मर्यादित – शरद पवार काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी थेट हस्तक्षेप न करता आपली भूमिका मांडली. मात्र, ही जागा अपघाताने रिक्त झाली असल्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान प्रतिनिधी गमावला आहे, याची जाणीव ठेवून या निवडणुकीकडे पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने, ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडावी, असा सल्ला आपण काँग्रेसला देऊ इच्छितो, असे शरद पवार यांनी नमूद केले. तथापि, अंतिम निर्णय हा काँग्रेसनेच घ्यायचा असून आपली भूमिका केवळ सल्ल्यापुरती मर्यादित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांचेही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी सपकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली. या बैठकीत त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही चर्चा केली. बंद दाराआड झालेल्या या संवादात अजितदादांसारखा मोठा नेता गेल्यानंतर ही निवडणूक भावनिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे मत रोहित पवार यांनी मांडले. मात्र काँग्रेसने आपली भूमिका ठाम ठेवली आहे. अजित पवार प्रकरणात योग्य तपास आणि कारवाई होणे गरजेचे असल्याचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला आहे. एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतरही जर तपासाला गती मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. याच कारणामुळे काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे लक्ष काँग्रेस हा स्वतंत्र विचारांचा पक्ष असल्याचे नमूद करत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा माघारीची विनंती केली आहे. कुटुंबातील सदस्य आणि अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून मी ही विनंती करत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसमध्येही या विषयावर अंतर्गत चर्चा सुरू असल्याची जाणीव होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते विधान चुकीचे होते. आता सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Source link
शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण