Headlines

सुनील तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला:दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारही भेटले, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आणि नेत्यांमधील सुप्त संघर्षाची चर्चा सुरू असतानाच, राज्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी घडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच खासदार पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची घेतली होती. त्यानंतर आता थेट प्रदेशाध्यक्षच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचल्याने महायुतीच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचे सविस्तर वृत्त अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार आणि आज सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे, “राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय?” असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या भेटींमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक आयोगाच्या पत्राने वाढवला होता सस्पेन्स! या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या एका पत्राशी जोडलेली आहे. राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात अनेक दिग्गज नेत्यांच्या अधिकृत पदांचा उल्लेखच गायब होता. या यादीत सुनील तटकरे यांच्या नावापुढे ‘प्रदेशाध्यक्ष’ आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे ‘कार्याध्यक्ष’ असा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला. हा घोळ समोर येताच पक्षात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर पक्षाने तातडीने निवेदन जारी करत “सुनील तटकरे हेच प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल हेच कार्याध्यक्ष पदावर कायम राहतील,” अशी सारवासारव केली होती. पक्षात कोणतीही चलबिचल नाही! दरम्यान, या संपूर्ण वादावर आणि नाराजीच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पक्षाची अधिकृत बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळले आहेत. “राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की, पक्षात कोणतीही चलबिचल किंवा कोणतीही नाराजी नाही. काही लोक जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवत आहेत. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार वहिनीसाहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि सुनील तटकरे साहेब हे सर्व पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि पक्षात एकजूट आहे. ज्या माध्यमांमध्ये वादाच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, त्या जाणीवपूर्वक पेरल्या गेल्या असून पूर्णपणे निराधार आहेत,” असे सुरज चव्हाण म्हणालेत. नव्या पिढीच्या वर्चस्वामुळे ज्येष्ठ नाराज? बारामती पॅटर्नमध्ये जनरेशन गॅप : पटेल व तटकरेंना बाजूला सारून पार्थ व जय पवारांकडे सूत्रे सोपवली जाणे, हा पक्षात असंतोषाचा केंद्रबिंदू आहे. नव्या पिढीच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाराज ज्येष्ठ नेत्यांची शांतता चिंतेची बाब ठरू शकते. बायपास डिप्लोमसी: पटेल-तटकरे समर्थकांमधील असंतोष व पक्षांतर्गत संघर्षावर सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणे २ ज्येष्ठ नेत्यांनी टाळले, त्याऐवजी महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मध्यस्थीचा मार्ग निवडला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *