![]()
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या निर्णयानंतरही राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असल्याचे दिसून येत आहे. सपकाळ यांनी सांगितले की, या निर्णयामागे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांचा मोठा प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 5 एप्रिलपासूनच संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर काल आणि आजही त्यांनी फोन करून पुन्हा आग्रह धरला. याशिवाय छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसेच अजित पवार गटातील इतर नेत्यांनीही काँग्रेसकडे माघारीची विनंती केली होती. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडत भावनिक दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन केले होते. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा झाली आणि शेवटी माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सपकाळ यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काँग्रेसची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची योग्य चौकशी व्हायला हवी. एफआयआर दाखल होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 23 एप्रिल रोजी मतदान, 4 मे रोजी निकाल बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार म्हणून आकाश मोरे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता मुख्य लढत टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असून काँग्रेसच्या माघारीनंतर त्यांचा मार्ग सुकर होण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
सुनेत्रा पवारांच्या आग्रहामुळेच काँग्रेसची बारामतीतून माघार:हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका