![]()
खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेले ऐतिहासिक वेरूळ येथील महामाया बुद्धविहारास व वेरूळ लेणीला नेपाळच्या भिक्खू संघाने नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी नेपाळचे भंते अलोकदीप यांनी वेरूळ येथे भिक्खू संघासाठी सुविधाजनक निवासस्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भंते अलोकदीप (नेपाळ), भंते उत्तमा (म्यानमार), भंते आनंद (नेपाळ) यांच्यासह महास्थवीर शांतरक्षित (अमरावती), भंते दीपंकर (बुलढाणा), ज्ञानवती, आभास्वती, धम्म करुणा, धम्मसती यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात महामाया बुद्धविहाराचे अध्यक्ष विनोद ढिवरे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन उपस्थित उपासक-उपासिकांनी त्रिसरण-पंचशील ग्रहण केले. सर्वप्रथम भिक्खू संघास श्रद्धापूर्वक भोजनदान देण्यात आले. धम्मदेसना देताना भंते अलोकदीप यांनी तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील विविध दाखले देत सांगितले की, तथागतांच्या मानवतावादी, करुणा व मैत्रीच्या विचारानेच आजच्या अशांत जगात खरी शांती नांदू शकते. वेरूळसारखे ऐतिहासिक स्थळ धम्म प्रचाराचे जागतिक केंद्र व्हावे. या सोहळ्यास परिसरातील समाज बांधव, उपासक व उपासिका उपस्थित होते. नेपाळ भिक्खू संघाच्या या भेटीमुळे वेरूळ येथील बौद्ध अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवासस्थान उभारण्यासाठी सहकार्य करू Ãयावेळी बोलताना भंते अलोकदीप म्हणाले, जगविख्यात वेरूळ बुद्ध लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांसह विविध देशांतील भिक्खू संघ नियमितपणे येत असतात. वेरूळ नगरीतील बुद्धविहाराची जागा प्रशस्त आहे. या ठिकाणी भिक्खू संघासाठी सुविधाजनक निवासस्थान निर्माण झाल्यास परदेशातून येणाऱ्या भिक्खूंना वास्तव्यासाठी मोठी मदत होईल. हे निवासस्थान उभारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. -भंते अलोकदीप, भिक्खू, नेपाळ संघ
Source link
गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारानेच जगात शांती नांदू शकते- भंते अलोकदीप:वेरूळ येथील लेणी , बुद्धविहारास नेपाळ भिक्खू संघाची सदिच्छा भेट