Headlines

पेट्रोल-डिझेलबाबतची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू:पुरवठ्यावर ताण येईल, अशाप्रकारे कुणीही साठेबाजी करू नये – CM फडणवीस




जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जगातील अनेक देशांनी पेट्रोल-डिझेल आणीबाणी घोषित केली आहे. काही देशांमध्ये तर दोन-दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशाही बिकट परिस्थितीत आपल्याकडे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भविष्यात इंधन मिळेल की नाही, या भीतीने नागरिकांकडून अचानक २० टक्के मागणी वाढली असून, कोणीही साठेबाजी करून यंत्रणेवर ताण आणू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन येथील नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्यांनी साठेबाजी करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या जागतिक संकट आहे. अशा संकटात पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना आणि जगात अनेक देशांनी पेट्रोल-डिझेल आणीबाणी घोषित केलेली आहे. काही ठिकाणी दोन-दोन दिवस लॉकडाउन आहे. अशाही परिस्थितीत आपल्याकडे आपण पेट्रोल-डिझेल देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे. विशेषत: या सीझनमध्ये शेतकरी डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात. साधारणपणे आपण ते देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो. शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्यांनी साठेबाजी करू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याकडे जेवढा कोटा मागील वर्षी होता. जवळपास तेवढाच कोटा आहे. पण भविष्यात पेट्रोल-डिझेल मिळेल की नाही, अशी भीती असल्याने २० टक्के मागणी वाढली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, पुरवठ्यावर ताण येईल, अशाप्रकारे कुणीही साठेबाजी करू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत. काही ठराविक गावांमध्ये जास्त हिंसक पद्धतीची प्रवृत्ती दिसत आहे. तिथे पोलिसांना देखील सांगितले की, अशा प्रकारे हिंसा करणाऱ्यांवर केली पाहिजे. जागतिक परिस्थितीमुळे महागाई, पण मोदींवर विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित एका पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. “मोदींच्या कारकिर्दीला १२ वर्षे झाली, मात्र देशातील महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या प्रश्नांची सोडवणूक सरकार कशी करणार?” असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला होता. या टीकेला चोख प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या या १२ वर्षांच्या कार्यकाळात बहुतांश काळ देशातील महागाईचा निर्देशांक हा सर्वात नीचांकी पातळीवर होता. सध्याची महागाई ही जागतिक परिस्थितीमुळे वाढली असून, त्याची झळ संपूर्ण जगासह आपल्यालाही पोहोचत आहे. मात्र, या जागतिक संकटावरही पंतप्रधान मोदी यशस्वीपणे उपाययोजना करत आहेत आणि भविष्यातही यातून मार्ग निघेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधान परिषद : नाशिक, संभाजीनगर, पुण्याच्या जागेवर खलबतं राज्यात सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी महायुतीमधील जागावाटपाची सद्यस्थिती स्पष्ट केली. जागावाटपा संदर्भात आमची सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांवर चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुणे जागेवर बोलणी सुरू आहे. आम्ही सर्व मित्रपक्ष एकत्र बसून यातून नक्कीच योग्य मार्ग काढू. अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसला, तरी लवकरच जागावाटपाचा तिढा सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *