![]()
मध्यप्रदेशातील रिवा भागात विहारत असलेल्या साध्वीजींना कारने धडक देऊन त्यांची हत्या करणाऱ्या कार चालकावर कठोर कारवाई करावी तसेच जैन मुनी व साध्वींना संरक्षण द्यावे या मागणीसाठी हिंगोलीत सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी ता. २५ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकातून सकाळी आकरा वाजता हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदर मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. मध्यप्रदेशातील रिवा येथे विहारत असलेल्या जैन साध्वींना एका कार चालकाने अक्षरशः कार त्यांच्या पाठीमागे आणून त्यांना जोरदार धडक दिली. याअपाघातात साध्वींचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चालकाने सुमारे ५० ते ६० किलो मिटर अंतरापर्यंत भरधाव वेगाने कार सह पळ काढला. यावरून चालक शुध्दीत होता हे सिध्द होत आहे. चालकाने मुद्दाम साध्वीजींना धडक देऊन अपघात घडविला. सदर घटना अपघात नसुन साध्वीजींची हत्या असल्याचा आरोप सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या कार चालकावर हत्येचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच यापुढे देशभरात भ्रमंती करणाऱ्या जैन मुनी व साध्वीजींना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी सकल जैन समाजातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Source link
हिंगोलीत सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा:मध्यप्रदेशातील साध्वींची हत्या करणाऱ्यावर कारवाईची मागणी