![]()
राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासनात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. काही महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. मात्र दीड महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून आता मुंढे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. राज्यातील या विभागावर मागील काही काळात भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गैरव्यवहारांचे आरोप झाले होते. अन्न आणि औषध प्रशासन विभागात सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याने या खात्यात मोठ्या बदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. अनेकांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या या मोहिमेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन उभं करण्याचं आव्हान दरम्यान, दिव्यांग विभागातील कारवाई जोरात सुरू असतानाच 31 मार्च रोजी त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्या कारवाईची गती मंदावल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा नव्या विभागात रुजू होताना तुकाराम मुंढे यांच्यासमोर भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन उभं करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागात पुढील काळात कोणते धडाकेबाज निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी