Headlines

वाशिममध्ये हृदयद्रावक घटना:पत्नीसह दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून स्वतःने घेतला गळफास, नेमके प्रकरण काय?




वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूची एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वडिलांनी प्रथम आपली पत्नी आणि दोन मुलांना विहिरीत ढकलून दिले व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, मृत महिलेच्या भावाने या घटनेवर तीव्र संशय व्यक्त केला असून, हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाशिम जिल्ह्यातील तिवळी गावात घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेत, संतोष तुकाराम बकाल (वय 35) यांनी आपली पत्नी तसेच मुलगी जान्हवी (वय 7) आणि मुलगा सोहम (वय 5) यांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, मृत महिलेच्या भावाने हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या शिरपूर पोलिस या प्रकरणाची आत्महत्या आणि हत्या अशा दोन्ही अंगांनी सखोल चौकशी करत असून, एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमुळे तिवळी गावासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. मृत इंद्रायणीच्या भावाकडून घातपाताचा संशय मृत इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी या घटनेत घातपाताचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संतोष बकाल यांना त्यांच्या सख्ख्या भावाकडूनच वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या आणि या धमक्यांचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात यापूर्वी अनेकदा पोलिसांत तक्रारी देण्यात आल्या होत्या. घरात सुरू असलेल्या या कौटुंबिक वादातूनच हा भयंकर प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंगोले यांनी केली आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ दुसरीकडे, या भयंकर घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिस निरीक्षक केशव वाघ यांनी स्पष्ट केले आहे की, ही आत्महत्या आहे की घातपात, याची कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून शवविच्छेदन अहवाल आणि सखोल तपासानंतरच खरे सत्य समोर येईल. दरम्यान, एकाच कुटुंबातील चार जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात मोठी हळहळ आणि शोककळा व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *