![]()
मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेत लेखी माफीनामा सोपवत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, याच वेळी सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारण्याच्या नव्या ट्रेंडवरून राज ठाकरे यांनी जैन समाजाला खडे बोल सुनावत अत्यंत कडक इशारा दिला आहे. जिरेटोप प्रकरणी मराठीत माफीनामा मालाडमध्ये घडलेल्या घटनेत छत्रपती शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आला होता. या घटनेमुळे शिवप्रेमी आणि मनसैनिकांमध्ये तीव्र संताप होता. याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी जैन समाजाच्या व्यापाऱ्यांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली आणि आपली चूक मान्य करत त्यांना मराठी भाषेत माफीनामा लिहून दिला. कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता? गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर, गिरगाव आणि इतर भागांतील सोसायट्यांमध्ये जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी रस्त्यांवर आणि सोसायटीच्या आवारात पांढरे पट्टे मारण्याचा ‘ट्रेंड’ सुरू झाला आहे. यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी जैन समाजाला सुनावले की, “गेल्या १०-१२ वर्षांतच असे वाद कसे सुरू झाले? याआधी तुमचे धर्मगुरू सोसायट्यांमध्ये यायचे नाहीत का? तेव्हा असे पांढरे पट्टे मारले जात नव्हते. तुमचे धर्मगुरू येणार असतील तर तुम्ही कार्पेट किंवा कापड टाका आणि ते गेल्यावर ते काढून घ्या. पण असे पांढरे पट्टे कसले मारता?”. दोन गुजराती वर बसलेत म्हणून काहीही करणार का? राज ठाकरे यांनी जैन समाजाला स्पष्ट शब्दांत राजकीय भान राखण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “तुमची माथी भडकवली जात आहेत. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्या अंगावर येऊ नका. तुम्हाला काय वाटतं, वर दोन गुजराती बसले आहेत तर तुम्ही काहीही करू शकता का?” असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला. आमची डोकी भडकली तर केवढं होईल… महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्याच्या प्रकरणावरून हे शिष्टमंडळ दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आले होते. मात्र, राज ठाकरेंनी त्यांना भविष्यासाठी सज्जड दम दिला. “तुम्ही व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा. तुम्ही पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करत आहात. जर तुम्ही अति करत असाल आणि आमची डोकी भडकली, तर केवढं होईल याचा विचार करा,” असा थेट इशारा त्यांनी दिला. यापूर्वी संदीप देशपांडे आणि इतर मनसे नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अनेक ठिकाणचे पांढरे पट्टे हटवण्यात आले होते. आता राज ठाकरे यांनी जैन व्यापारी वर्गाला स्पष्ट आणि कडक इशारा दिला आहे. संबंधित बातमी वाचा.. मुंबईत शिवरायांच्या जिरेटोप शिल्पावर जैन समाजाचा झेंडा, VIDEO:मनसे आक्रमक होताच संबंधित व्यक्तीकडून पोलिसांसमोर जाहीर माफी मुंबईतील मालाड पूर्व परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या शिल्पावर जैन समाजाचा पांढरा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे विभागाध्यक्ष महेश फरकासे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि झेंडा लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याच्याकडून जाहीर माफी मागून घेतली. सविस्तर वाचा
Source link
जिरेटोपप्रकरणी जैन समाजाचा राज ठाकरेंकडे माफीनामा:कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता? वर दोन गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता का?, राज ठाकरेंचा थेट इशारा