![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कार्यावर राज्यभरातील लोकप्रतिनिधींचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेकडे आमदार आणि खासदारांचा ओढा सातत्याने वाढताना दिसतोय. येणाऱ्या काही दिवसांत राज्यातील अनेक मोठे लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करतील, असे सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. प्रकाश आबिटकर म्हणाले की, गोकुळची निवडणूक आम्ही महायुतीमधील सर्व घटक पक्ष मिळून एकत्र लढणार आहोत. कालच मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांचे ठराव दाखल केले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात काहीही गैर नाही. अंमली पदार्थांचा काळाबाजार खपवून घेणार नाही प्रकाश आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी आम्ही विशेष अभियान सुरू केले असून, येत्या काही दिवसांतच याचे सकारात्मक बदल पाहायला मिळतील आणि दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल.शाहू महाराजांच्या पावन नगरीत अंमली पदार्थांचा कोणताही काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. हा मुद्दा केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्य आणि देशाची ही एक मोठी समस्या बनली आहे, असे म्हणत आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत ‘राज्यात टपऱ्या टपऱ्यांवर गांजा मिळतो’ असे म्हणत उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यावर आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली. रुग्णवाहिकेचा प्रश्न लवकरच सुटेल प्रकाश आबिटकर म्हणाले की, आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या रुग्णवाहिकांचे काम सुरळीत सुरू आहे. मुख्य अडचण रुग्णवाहिका नसल्याची नसून योग्य वेळी योग्य ठिकाणी ती उपलब्ध होणे ही आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी सर्व विभागांमध्ये अधिक चांगला समन्वय असणे गरजेचे आहे, त्यावर आमचे काम सुरू असून लवकरच हा प्रश्न सुटेल. प्रत्येकाने मर्यादा पाळली पाहिजे प्रकाश आबिटकर म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकानेच आपल्या बोलण्यात मर्यादा पाळली पाहिजे. अनावधानाने घडलेल्या या प्रकाराबद्दल संजय दिना पाटील यांनी नंतर दिलगिरी देखील व्यक्त केली आहे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Source link
आमदार-खासदारांचा शिवसेनेकडे ओढा वाढलाय, अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतील:प्रकाश आबिटकरांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण