महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेली त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, तपास पूर्ण झाल्याने
.
आरोपींनी कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असले तरी, हा कट नेमका कुठे रचला आणि गुन्ह्याची अंमलबजावणी कशी केली, याचा सखोल तपास अद्याप बाकी आहे. सियाप्रमाणेच चेतनला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचे ‘रिक्रिएशन’ करणे, त्यांनी लोहगडावर आधी रेकी केली होती का हे तपासणे आणि या कटात इतर कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे.
चेतन-सियाच्या पोलिस कोठडीत वाढ
याशिवाय, बाली येथील प्री-वेडिंग शूटला जायचे नसल्याने फाडलेला केतनचा पासपोर्ट शोधणे, उशिरा जमा केलेल्या केतनच्या मोबाईलमधील लपवलेली माहिती ‘रिकव्हर’ करणे आणि गुन्ह्याच्या वेळी वापरलेले चेतनचे कपडे हस्तगत करणे या महत्त्वाच्या तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आई-वडिलांच्या म्हणण्यावरून त्याला ‘हत्या’ ठरवता येणार नाही- सियाचे वकील
दुसरीकडे, सुनावणीदरम्यान आरोपींना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत बचाव पक्षाच्या वकिलांनी सुरुवातीलाच न्यायालयात आपला अर्ज दाखल करून घेण्याची मागणी केली. सियाचे वकील विपुल दुष्यम यांनी युक्तिवाद केला की, या प्रकरणातील चौकशी, नाट्यरुपांतर (रिक्रिएशन) आणि प्राथमिक तांत्रिक तपास आधीच पूर्ण झाला असून, आता केवळ पुढील तांत्रिक तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तसेच, हा मृत्यू दरीत पडून झालेला असताना केवळ मृताच्या आई-वडिलांच्या म्हणण्यावरून त्याला ‘हत्या’ ठरवता येणार नाही आणि पोलिसांची पुन्हा नाट्यरुपांतर करण्याची मागणीही अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा दाखल झालेला गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा करत, आरोपींना पोलिस कोठडी न देण्याची विनंती सियाच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली.
चेतनचे वकील काय म्हणाले?
तर चेतनच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत पोलिस कोठडीत वाढ करण्याला कडाडून विरोध दर्शवला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, एफआयआरमध्ये चेतनचे नाव केवळ दोनच वेळा आले असून, केवळ सियाने त्याचे नाव वारंवार घेतल्यामुळे त्यांच्यावर कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पंचनामा, मुद्देमाल जप्ती आणि समोरासमोर बसून चौकशी करण्यासाठी यापूर्वीच सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती.
पुढे बोलताना चेतनचे वकील म्हणाले, या काळात पोलिसांनी लोहगडावर सियाचे नाट्यरुपांतर (रिक्रिएशन) केले, मग आता चेतनच्या नाट्यरुपांतराची मागणी का केली जात आहे? तसेच, आधीच्या तपासात हुडी, मोबाईल आणि गाडी जप्त केली असताना, त्यावेळी पॅन्ट का जप्त केली नाही? आणि मोबाईल जर सियाकडे होता, तर त्यासाठी चेतनच्या कोठडीची काय आवश्यकता आहे? असे अनेक सवाल वकिलांनी उपस्थित केले.
पोलिसांच्या तपासावर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना चेतनचे वकील पुढे म्हणाले की, आरोपींनी घटनास्थळाचा सराव केला होता का, हे पाहायचे होते तर मग गेल्या सात दिवसांत पोलिस तिथे का गेले नाहीत? केवळ कोठडी वाढवून मिळवण्यासाठी कोणतीतरी दोन कारणे पुढे केली जात आहेत. ‘गेट अॅनालिसिस’ करण्याचे पोलिसांना पहिल्या सात दिवसांत का सुचले नाही, याचे त्यांनी आधी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी चेतनच्या वकिलांनी केली आहे.
तसेच आम्ही तपासात सहकार्य करत स्वतःहून गाडी पोलिसांकडे आणून दिली, जर त्यांनी पॅन्ट मागितली असती तर तीही दिली असती. आम्हाला या प्रकरणातील सर्व गोष्टी केवळ मीडियाकडूनच समजत आहेत, असे सांगत चेतनच्या वकिलांनी त्याच्या पोलिस कोठडीत कोणतीही वाढ करू नये, अशी विनंती न्यायालयाकडे केली.
चेतनला केलेली अटक बेकायदेशीर
चेतनच्या वकिलांनी न्यायालयात ‘पंकज बन्सल’ प्रकरणाचा दाखला देत अटकेच्या वैधतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ अजामीनपात्र (नॉन बेलेबल) गुन्हा आहे आणि त्यात आरोपीचे नाव आहे, एवढ्याच कारणावरून भारतात कोणालाही अटक करता येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. कायद्यानुसार ‘अटकेचे कारण’ आणि ‘अटकेचा आधार’ यात फरक असून, ‘ग्राउंड ऑफ अरेस्ट’ हे प्रत्येक आरोपीसाठी वैयक्तिक दस्तऐवज असायला हवे. मात्र, या प्रकरणात सियाच्या अटकेसाठी दिलेली 1 ते 5 कारणे जशीच्या तशी चेतनच्या अटकेसाठी (1 ते 3 कारणे) वापरण्यात आली आहेत. याकडे लक्ष वेधत, वकिलांनी ‘निमित भुता’ प्रकरणाचा संदर्भ देऊन ही अटक कशी बेकायदेशीर आणि चुकीची आहे, हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
‘मीडिया ट्रायल’ तत्काळ थांबवावे
पोलिस कोठडी (रिमांड) वाढवून मागण्यासाठी पोलिसांनी जे कारण दिले आहे, ते मुळात एकच असून केवळ त्याचे चार वेगवेगळे भाग करून ते सादर करण्यात आले आहे. ज्या कारणांसाठी आता कोठडी मागितली जात आहे, त्यासाठीच यापूर्वी सात दिवसांची कोठडी आधीच देण्यात आली होती, असे वकील विपुल दुष्यंत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, या प्रकरणाची सध्या जी ‘मीडिया ट्रायल’ सुरू आहे ती तत्काळ थांबवण्याचे निर्देश देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. न्यायालयासमोर माहिती येण्याआधीच ती मीडियाकडे कशी पोहोचते, असा संतप्त सवाल उपस्थित करत, जर मीडियाने आधीच सर्व काही तपासाचे तपशील दाखवले असतील, तर याचा अर्थ पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता कोठडीत वाढ करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असा जोरदार युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद
सरकारी वकिलांनी म्हटले की, चेतन आणि सिया दोघे मित्र आहेत, हे सिद्ध झाले. घटनेच्या आधीचे सीसीटीव्ही जप्त केलेय. त्यामध्ये एकत्र बसून बोलतायेत. 31 मे, 4 आणि 14 जून यावेळी पण लोहगडावर जाऊन हत्या करण्याचा कट झाला होता. त्याचे प्लॅनिंग कुठे झाले हे तपासायचे आहे. चेतनने तिकीट काढले नाही? कामगार नीरजचा फोन घेऊन गेला? बरं तो लोहगडावर त्यावेळी का आला? म्हणजे कट रचलेला आहे. तपास योग्य दिशेने झालेला आहे. पुढेही तपास होणे गरजेचे आहे. सियानंतर चेतनचे रिक्रियेशन करणे गरजेचे आहे, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.
केतन अग्रवाल हत्येशी संबंधित ही बातमी पण वाचा…
सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले:कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक नवीन बाब समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सियाने लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने केतनकडून १ कोटी रुपये घेतले होते. मात्र, खरेदी करण्याऐवजी तिने ती सर्व रक्कम तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिली.
६ जून रोजी बाली येथील ‘प्री-वेडिंग ट्रिप’साठी या जोडप्याला विमानतळावर सोडणाऱ्या वैभव जाधव या कॅब चालकाचे एक विधान समोर आले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, सियाला बालीला जायचे नव्हते; तिचा भाऊ साहिल याने तिला बळजबरीने गाडीत बसवले होते. पुण्यापासून रावेत (पिंपरी-चिंचवड) पर्यंतच्या प्रवासात या बहीण-भावांमध्ये वाद सुरू होता. वाचा सविस्तर बातमी…
या घटनेशी संबंधित या बातम्या सुद्धा वाचा…