![]()
गावातील व्यक्तींचा विकास करण्याचे मुख्य साधन ग्रामपंचायत आहे, असे प्रतिपादन पाटोदा येथील आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
.
येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उत्सव समितीने रविवारी (दि. १२) आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
पेरे पाटील म्हणाले, गावाची ओळख, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य जपण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या हातात आहे. मनात द्वेष न ठेवता सर्व समाजातील लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तालुक्यात गावविकासाची ओळख अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करायला हवेत. गाव विकसित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर मंथन करावे. गावाची पारंपरिक कला, साहित्य, संगीत, खेळ यांची जोपासना ही काळाची गरज आहे. गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे. परिसर स्वच्छ ठेवावा. शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे. प्रत्येक नागरिक व महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शुद्ध पाणी प्यावे. उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे. जास्त दिवस टिकणारे पॅकिंगचे खाद्यपदार्थ, प्लास्टिक यांचा वापर करू नये, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुधीर बागूल यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या वेळी भास्कर पेरे पाटील यांचा उत्सव समितीचे उपाध्यक्ष, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी राजाराम बागूल, माजी सरपंच रमेश बागूल यांच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पंचायत समिती सदस्य हुसेन शेख यांचा अध्यक्ष सुधाकर बागूल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
घराच्या परिसरात वृक्ष लागवड करा ः अधिक प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. एका व्यक्तीला प्रतिदिन २८ किलो ऑक्सिजन लागतो. एक वृक्ष ८ किलो ऑक्सिजन देतो. त्यामुळे येथील लोकसंख्येच्या तुलनेत ४० हजार वृक्ष आवश्यक आहेत. तेवढे वृक्ष नसल्याने परिसरात पाऊस कमी पडतो. पुढील काळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येकाने घराच्या परिसरात वृक्ष लागवड करावी, असे त्यांनी सांगितले.