![]()
शिक्षकाने विद्यार्थ्याला अभ्यासासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी रागावणे अथवा शिक्षा करणे, याला विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे मानले जाऊ शकत नाही, असा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निकाल दिला असून, संबंधित शिक्षकावर दाखल असलेला फौजदारी गुन्हा बेकायदेशीर ठरवत तो पूर्णपणे रद्द केला आहे. हे संपूर्ण प्रकरण १ जुलै २०२५ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या वासाडी (बु.) येथील जय बजरंग शाळेत घडले होते. खामगाव (लखनवाडा) येथील रहिवासी असलेले गोपाल सूर्यवंशी हे या शाळेत शिक्षक आहेत. वर्गात विज्ञानाचा तास सुरू असताना शिक्षक सूर्यवंशी यांनी विवेक नावाच्या विद्यार्थ्याला एका वैज्ञानिक संकल्पनेची व्याख्या विचारली होती. मात्र, विवेकला त्याचे उत्तर देता आले नाही. उत्तर न आल्यामुळे शिक्षकाने विवेकला वर्गातच १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. विवेकने २० ते २५ उठाबशा काढल्या, परंतु त्याच्या पायाला आधीच दुखापत असल्यामुळे त्याने पुढील उठाबशा काढण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे शिक्षक सूर्यवंशी संतापले आणि त्यांनी विवेकला संपूर्ण वर्गासमोर अत्यंत कडक आणि कठोर शब्दांत सुनावले. अपमान सहन न झाल्याने विद्यार्थ्याचे पाऊल वर्गात झालेल्या या अपमानामुळे प्रचंड दुखावलेला विवेक शाळेच्या मधल्या सुट्टीत कोणालाही न सांगता घरी निघून गेला. त्याने आपल्या शेतातील एका पडक्या खोलीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकाच्या याच वागणुकीचा उल्लेख होता, ज्याच्या आधारे पोलिसांनी शिक्षकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने नोंदवलेले महत्त्वपूर्ण निरीक्षण या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी कायदेशीर आणि सामाजिक बाजू तपासून महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. शिक्षकाने त्या विद्यार्थ्याचा आधी कधी मानसिक किंवा शारीरिक छळ केला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता, असे सिद्ध करणारा एकही पुरावा तपासात समोर आलेला नाही. शिक्षकाचा गुन्हेगारी हेतू नव्हता घटनेच्या दिवशी शिक्षकाने वापरलेले शब्द नक्कीच चुकीचे आणि आक्षेपार्ह होते. परंतु, आपल्या या बोलण्यामुळे विद्यार्थ्याने इतके टोकाचे पाऊल उचलावे किंवा त्याने आपले जीवन संपवावे, असा शिक्षकाचा कोणताही हेतू (Mens Rea) नव्हता. केवळ शिस्त आणि अभ्यासासाठी त्यांनी ते शब्द उच्चारले होते. मृत विद्यार्थी ‘अतिसंवेदनशील’ होता: सामान्य बुद्धीचा किंवा सामान्य मानसिकतेचा कोणताही विद्यार्थी शिक्षकांच्या अशा रागावण्यामुळे एवढी मोठी घटना घडवणार नाही. मृत मुलगा अतिसंवेदनशील होता आणि त्याने केवळ क्षणिक भावनांच्या भरात स्वतःचे जीवन संपवले, असे न्यायालयाने स्पष्ट केले. शिक्षकांना मोठा कायदेशीर दिलासा दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, वर्गातील शिस्त आणि शैक्षणिक सुधारांसाठी केलेल्या कायदेशीर कारवाईला गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य मानता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने तांत्रिक बाबी तपासून शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांच्यावरील एफआयआर (FIR) रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Source link
शिक्षकाने शिस्तीसाठी रागावणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे!:नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, शिक्षकावरील गुन्हा रद्द