Headlines

मोशी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटवणे सुरू:जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी संरचना स्थिर करण्यावर भर




मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या सुमारे आठ नागरिकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) मार्गदर्शनाखाली इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने हटवला जात आहे. जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी इमारत स्थिर करणे हे सध्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दुर्घटनेमुळे इमारतीचा एक मोठा भाग कोसळला असून, उर्वरित संरचना अत्यंत अस्थिर अवस्थेत आहे. विशेषतः इमारतीचा पाया मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने संपूर्ण संरचनेच्या स्थिरतेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणतीही घाई न करता, प्रत्येक टप्प्यावर संरचनात्मक सुरक्षिततेचा विचार करून बचाव मोहीम राबविण्यात येत आहे. एनडीआरएफच्या तांत्रिक पथकाच्या मार्गदर्शनाखाली ब्रेकर मशिनच्या सहाय्याने इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने पाडण्यात येत आहे. त्यानंतर निर्माण होणारा राडारोडा जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने हटवला जात आहे. धोकादायक भाग पूर्णपणे हटवल्याने इमारतीवरील अतिरिक्त ताण कमी होऊन उर्वरित संरचना अधिक स्थिर होण्यास मदत होईल. सध्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेला मार्ग अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहे. अशा परिस्थितीत जवानांना आत पाठवणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे प्रथम इमारतीची स्थिरता सुनिश्चित करूनच जवानांना सुरक्षितपणे आतमध्ये प्रवेश देता येईल, अशा पद्धतीने संपूर्ण बचावकार्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बचावकार्यात एनडीआरएफ, पुणे महानगरपालिका (PMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अग्निशमन दल, पोलीस दल, आपत्ती व्यवस्थापन दल तसेच इतर संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयाने काम करत आहेत. घटनास्थळी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि तांत्रिक साधने उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. याबाबत माहिती देताना एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट म्हणाले, “सध्या आमचे प्राधान्य इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने हटवून संरचना शक्य तितकी स्थिर करणे हे आहे. त्यानंतर जवानांना सुरक्षितपणे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक मार्ग उपलब्ध होईल. बचावकार्यात कोणतीही जोखीम न घेता प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे.” महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांशी ते नियमित समन्वय साधत आहेत. बचावकार्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *