![]()
प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूर शहरात सध्या गुन्हेगारीचा कळस झाला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या गोळीबाराच्या चार घटना आणि हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्यासह दोघांच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ सलग चौथ्या दिवशीही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या गंभीर परिस्थितीवरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून, आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाकडे गांभीऱ्याने लक्ष द्या अशी विनंती केली आहे. रोहित पवारांचा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी श्रीरामपूरमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन ते तीन आठवड्यांत शहरात चार वेळा गोळीबार झाला असून तिन जणांचे खून झाले आहेत. या दहशतीमुळे सामान्य नागरिक आणि व्यापारी प्रचंड भयभीत झाले आहेत. गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सलग चार दिवसांपासून शहर बंद असून यात शाळाही बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. येथील गुन्हेगारांना नेमके कोणाचे अभय आहे? असा सवाल करत पवारांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कारभारावर मोठा संशय व्यक्त केला आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याला एकाच जिल्ह्यात आठ-दहा वर्षे पोस्टिंग कशी मिळते? नुकताच निलंबित झालेला एक पोलिस कर्मचारी नेमका कुणासाठी हप्ते (कागद) गोळा करत होता? असे सणसणीत प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या गुन्हेगारांचा ‘आका’ कितीही मोठा असला, तरी त्यांचे कंबरडे मोडून शहर भयमुक्त करावे, अशी विनंती रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गुन्हेगारीचा महिनाभरात बीमोड करणार- मंत्री विखे दरम्यान, शनिवारी रात्री शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुबैया यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली. पोलिसांनी वेळेवर आणि कठोर पावले उचलली असती, तर आज ही भीषण परिस्थिती ओढवली नसती, असे विखे पाटील म्हणाले. त्यांनी थेट राज्याचे पोलिस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली असून, कोणत्याही परिस्थितीत एका महिन्यात श्रीरामपूरमधील गुन्हेगारीचा समूळ बीमोड करण्याचे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. स्वतः पोलिस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालत असून गुन्हेगारांना राजकीय किंवा सामाजिक पाठबळ देणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. वाळू माफिया आणि ड्रग्जच्या विळख्यातून शहराला वाचवणार श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा वाळू तस्करीतून गुन्हेगारी टोळ्या आणि गँगवॉर भडकत असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी प्रामाणिक अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर वाळू धोरणात बदल करण्यात आला होता. आता पुन्हा या वाळू माफियांनी डोके वर काढले असून, हा विषय शासन दरबारी प्राधान्याने मांडून त्यांच्यावर पूर्ण अंकुश ठेवला जाईल, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले. यासोबतच शहरात ऑनलाईन माध्यमातून नशेची इंजेक्शन्स आणि घातक अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या गंभीर तक्रारी आल्या आहेत. या तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालत असून, युद्धपातळीवर कठोर कारवाई सुरू असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट:सुप्रिया सुळेंनी सर्व चर्चा फेटाळल्या; पत्रकार परिषदेत सांगितला 50 टक्के जागावाढीचा प्रस्ताव नेमका काय! संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘मतदारसंघ पुनर्रचना’ (डिलिमिटेशन) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चा केवळ ‘सूत्रांच्या’ आधारे असून, पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही, असा मोठा खुलासा पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या विधेयकामागचा इतिहास, अमित शहांचा प्रस्ताव आणि ‘इंडिया’ आघाडीची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. सविस्तर वाचा..
Source link
श्रीरामपूर सलग चौथ्या दिवशी बंद:वाढत्या गुन्हेगारीवर रोहित पवारांचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी