![]()
तालुक्यातील रुक्मिणीचे माहेरघर आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे श्री अवधूत महाराजांच्या झेंडे जीर्णोद्धाराच्या रथयात्रेचा नुकताच समारोप झाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. या पथयात्रेची सुरुवात १० ऑक्टोबर रोजी सकाळी श्रीसंत अवधूत महाराज चातूर्पती देवस्थान कौंडण्यपूर येथून झाली होती. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे संत अवधूत महाराज. त्यांनी आपल्या वाणी, लेखणी आणि विचारांतून शांती, समता, बंधुता, प्रेम आणि भक्तीचा मार्ग शिकवला. त्यांच्या ओव्या भविष्याचा वेध घेणाऱ्या असून त्या आजही प्रासंगिक आहेत. अवधूत महाराजांचे लाखो अनुयायी महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहेत. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भजन-पूजनाने सुरू झालेला हा पथयात्रेचा प्रवास कौंडण्यपूर ते राहू (मेळघाट) असा होता. मेळघाटातील अतिदुर्गम आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या राहू येथून अवधूत महाराजांचे झेंडे आणायचे होते. अतिशय खडतर मार्गातून, उंच माथ्यावरून हे वजनदार झेंडे घेऊन येणे हे एक दिव्य कार्य होते. तरीही, अवधूत भक्तांनी कोणतीही तमा न बाळगता हे कार्य पूर्ण केले. त्यांनी भजन-पूजनाच्या गजरात आणि ‘कृष्ण महाराज धनी अवधूत नाम’ असा जयघोष करत चार विशालकाय झेंडे खांद्यावर उचलून डोंगरावरून खाली आणले. पुढे या झेंड्यांची विधीवत पूजा करून त्यांना मोठ्या ट्रकमध्ये ठेवून परतीचा प्रवास सुरू करण्यात आला. या प्रवासात प्रत्येक गावात करपूजा करणाऱ्यांचे भरभरून स्वागत झाले. हजारो भाविक रस्त्याच्या दुतर्फा या झेंड्यांचे दर्शन घेण्यासाठी जमत होते. अमरावतीमध्ये राजीवजी ठाकूर यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिवसा येथील पंचवटी चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. शेंदुर्जणा बाजार, वाठोडा खुर्द, शेंदुर्जणा माहोरा मार्गे ही जीर्णोद्धार पथयात्रा चतूर्पती देवस्थान येथे दाखल झाली. मंदिरात दाखल झाल्यावर झेंड्यांची विधीवत पूजा करण्यात आली आणि त्यांना मंदिर परिसरात ठेवण्यात आले आहे. आता पुढील दोन महिने या झेंड्यांवर प्रक्रिया करून १२ जून रोजी त्यांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.
Source link
अवधूत महाराजांचे झेंडे 300 किलोमीटरची यात्रा पूर्ण करून परतले:कौंडण्यपूर येथे झेंडा जीर्णोद्धार पथयात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप