![]()
अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ते झाडावरून खाली उतरले. खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती. रात्री साडेदहा ते सकाळी साडेतीन या वेळेत होणारा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असल्याने त्यांचे संपूर्ण पीक वाया गेले. या आर्थिक नुकसानीमुळे ते हताश झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गजानन लवटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले. यानंतर, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन दिले की, वेळेनुसार नियमित वीजपुरवठा सुरू ठेवला जाईल. या आश्वासनानंतर अतुल खारोडे झाडावरून खाली उतरले. यावेळी अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार सागर भास्कर, शिवसेना शहर प्रमुख राजू अकोटकर, माजी नगरसेवक शंकर मालठाणे, जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, विकास येवले तसेच सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ आणि परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यापुढे वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले असून, तसे लेखी पत्रही शेतकऱ्याला देण्यात आले आहे.
Source link
वीजपुरवठा खंडित झाल्याने पीक नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतर अंजनगावमधील शेतकरी झाडावरून खाली उतरला