![]()
.
सिल्लोड तालुक्यातील बाभूळगाव बु.येथे विठ्ठल रुखुमाई मंदिर वर्धापन दिनानिमित्त मंगळवार (दि.२१) रोजीपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला होता. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह,भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप मंगळवारी (दि.२८) रोजी काल्याच्या कीर्तनाने झाला. या समारोपप्रसंगी सकाळी संपूर्ण गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वरी पारायण व कलश मिरवणूक काढण्यात आली होती. या काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम, जय विठ्ठल जय जय विठ्ठल या जयघोषाने बाभूळगाव नगरी गोकुळमय झाली होती. या मिरवणुकीत महिला भगिनींनी विविध भक्तिगीतांवर पावले फुगड्या खेळून चांगलीच रंगत आणली होती, तर कुमारिका मुलींनी डोक्यावर तुळशी कलश घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली होती. या मिरवणुकीसाठी गावातील महिलांनी ठिकठिकाणी आपापल्या घरासमोरील अंगणात सडा-सारवण करून रांगोळ्या काढल्या होत्या. पालखी मिरवणूक घरासमोर आल्यानंतर महिलांनी ग्रंथाचे पूजन करून औक्षण केले. मिरवणुकी झाल्यानंतर १० ते १ वाजेदरम्यान दीपक महाराज बादाडे यांचे काल्याचे कीर्तन होऊन सांगता झाली. या सांगतानिमित्त बजरंग दलातर्फे भाविक भक्तांसाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ४० किलो वरण डाळ, ४० किलो भात, ८० किलो बटाट्याची भाजी, ४० किलो गुलाबजामून, तीन क्विंटलच्या पोळ्या असा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दीपक महाराज बादाडे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. या वेळी जवळपास दीड हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी या वेळी सप्ताह समिती, बजरंग दल व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
भाविकांना तीन क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद वाटला
भाविक भक्तांसाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ४० किलो वरण डाळ, ४० किलो भात, ८० किलो बटाट्याची भाजी, ४० किलो गुलाबजामून, तीन क्विंटलच्या पोळ्या असा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दीपक महाराज बादाडे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.