Headlines

उद्धव साहेबांवर नाराज नाही:पण सत्तेशिवाय कामे होत नाहीत, जनतेच्या कामांसाठी सत्तेत जाणे कर्मप्राप्त – नागेश पाटील आष्टीकर




शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची टंचाई हेच असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या बंडखोरीबाबत बोलताना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, “मी आज आपल्यासमोर दोन तीन दिवसांच्यानंतर पहिल्यांदा पोस्ट करत आहे. बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे. प्रथमत: मी सांगू इच्छितो की, नाराज वैगेर होऊन गेलेलो नाहीये. उद्धव साहेबांवर मी मुळीच नाराज नाहीये. उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिले, यात दुमत नाही. संजय राऊत किंवा मोठी मंडळी काही बोलत असतील, तर तो त्यांचा हक्क आहे. त्यांनीही माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्यामुळे ते बोलतात. काही अडचणीचे नाही. ते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यामुळे ते बोलले तर मला वाईट वाटणार नाही. १८ जूननंतर अचानक काय घडले? बंडखोरीच्या वेळेबाबत खुलासा करताना नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, १८ जूनपर्यंत आमच्यापैकी कोणीही कुठेही गेले नव्हते. मात्र, त्यानंतर पक्षाकडून ज्या पद्धतीने बोलण्याचा अतिरेक झाला, त्यामुळे आता तिथे थांबून काही फायदा नाही, असा विचार बऱ्याच सहकाऱ्यांनी केला आणि हे पाऊल उचलले. ५ कोटींच्या निधीत कामे कशी करायची? सत्तेत सामील होण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना नागेश पाटील यांनी मतदारसंघातील अडचणी मांडल्या. ते म्हणाले, “सत्तेशिवाय कार्यकर्त्यांची आणि जनतेची कामे होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मतदारांनी मला खूप मोठ्या आशेने निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांची कामे करणे हे माझे कर्तव्य आहे. आपल्याला विकासासाठी कुठलाही निधी मिळत नव्हता. केवळ खासदारांना मिळणारा ५ कोटींचा निधी गावोगावच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अतिशय अपुरा पडतो. प्रत्येक गावात गेल्यावर लोकांना विकासाची अपेक्षा असते. जर निधीच नसेल, तर मी लोकांची कामे कशी करू?” मी जनतेचा ‘सालदार’, नेकीने काम करणार आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना खासदार पाटील म्हणाले की, हे पाऊल कदाचित काहींना पटले असेल, तर काहींना पटले नसेल; शेवटी जनता जनार्दन आहे. “निवडणुकीपूर्वी मी जनतेला म्हणालो होतो की, मला तुमच्या सेवेसाठी ‘सालाने’ (वर्षाच्या करारावर) ठेवा, मी तुमचे साल नेकीने पार पाडेन. मी गेल्या दोन वर्षांपासून निष्ठेने काम करत आलो आहे आणि पुढेही करत राहीन. मतदारसंघाचा विकास आणि निधी आणण्यासाठीच मला सत्तेत जाणे कर्मप्राप्त होते. माझ्यावर जनतेने टाकलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *