Headlines

निरंजन संस्थेने घेतले 3 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व:बीड, अहिल्यानगर, पुण्यातील विद्यार्थ्यांना क्लिन सायन्सचे सहकार्य




पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने महाराष्ट्रातील ३ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दुष्काळग्रस्त बीड, अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामुळे शिक्षणाची संधी मिळणार आहे. क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम राबवला जात आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी यांनी ही माहिती दिली. या उपक्रमांतर्गत पुणे आणि परिसरातील २९ शाळांमधील २ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. संस्थेचे सचिव सीए दुर्गेश चांडक यांनी सांगितले की, संस्था अनेक वर्षांपासून गरजू आणि गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला १६ प्रकारच्या वस्तू असलेले शैक्षणिक किट दिले जाईल. यामध्ये सॅक, छत्री, भूमिती बॉक्स, टोपी, पॅड, पेन्सिल बॉक्स, डबा, रजिस्टर, चित्रकला वही, २०० पानी व ५२ पानी एकेरी वह्या, ५२ पानी दुरेघी वह्या, पाण्याची बाटली, बॉल पेन आणि रंगीत पेन यांसारख्या वर्षभर पुरणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. कार्याध्यक्ष भारत वेदपाठक यांनी सांगितले की, संस्थेने २०१२ मध्ये बीडमधील दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पुणे, रायगडसह तोरणा, लोहगड, तुंग आणि मुळशीतील नांदगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. पुढे जम्मू-काश्मीर आणि अहिल्यानगरमधील गरजू विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात समाविष्ट करून घेण्यात आले. निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान केले जाते, कारण अनेक ठिकाणी पैशाअभावी मुलांना शिक्षण घेता येत नाही. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ हून अधिक शाळा आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. संस्थेतर्फे गरजूंना सायकलची मदत, ग्रामीण भागातील शाळा डिजिटल करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ बसवणे तसेच महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन व पिठाची गिरणी वाटप यांसारखे विविध कार्यक्रमही सातत्याने राबवले जातात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *