![]()
नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून आतापर्यंत चारहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार राजू शेट्टी यांनी या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शेट्टी यांनी म्हटले आहे की, या आत्महत्या नसून सरकारी अनास्थेने केलेल्या हत्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या ‘नीट’ वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या मानसिक तणावाखाली आहेत. गेल्या आठवड्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकण भागांत फिरताना नीट परीक्षार्थी पालक व विद्यार्थी हतबल झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांनी आपले आयुष्य पणाला लावले होते. अनेकांनी शेतजमीन विकली, तर काहींनी घर गहाण ठेवून किंवा विकून मुलांच्या कोचिंग क्लासेसची आणि शिक्षणाची फी भरली होती. पालकांनी कष्ट करून गोळा केलेला पैसा आणि मुलांची मेहनत या घोटाळ्यामुळे वाया गेली आहे. पेपरफुटी आणि गुणांमधील फेरफारमुळे पात्र विद्यार्थ्यांना डावलून पैसेवाल्यांना प्रवेश मिळत असल्याने प्रामाणिक विद्यार्थी तीव्र मानसिक तणावाखाली आहेत. शेट्टी यांनी आरोप केला की, पेपरफुटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल होते. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना शासकीय गोपनीय बैठका, परीक्षांचे नियोजन आणि कंत्राटांची माहिती आधीच कशी मिळते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पेपरफुटीचे धागेदोरे सत्तेसोबत असणाऱ्या लोकांच्या सभोवताली फिरत असल्याचा दावा करत, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर बुलडोझर फिरवण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का, असा सवाल शेट्टी यांनी केला. सरकारमधील यंत्रणाच भ्रष्ट झाल्याने असे प्रकार घडत असल्याची टीकाही त्यांनी केली.
Source link
नीट घोटाळ्यामुळे ४ विद्यार्थ्यांची आत्महत्या:पालकांचे संसार उद्ध्वस्त, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – राजू शेट्टी