![]()
राज्यातील बहुतांश भागात पेट्रोल – डिझेलच्या टंचाईने स्थिती बिकट बनली आहे. आता परभणीच्या मानवत येथे डिझेलसाठी नागरिकांत चक्क हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, त्यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, मानवत तालुक्यातील रूढी पाटी शिवारातील एका पेट्रोल पंपावर डिझेलसाठी नागरिकांची लांबलचक रांग लागली होती. यावेळी अचानक दोन गटांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर डिझेलसाठी आणलेल्या कॅन फेकत मारहाण केली. या घटनेमुळे पेट्रोल पंपावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच काहीवेळ इंधन वितरणही विस्कळीत झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत केले. या घटनेमुळे इंधन टंचाईची स्थिती किती बिकट झाली आहे हे अधोरेखित होते. सावधान, जनतेच्या संयमाचा बांध फुटतोय – वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. परभणीच्या मानवतमध्ये डिझेलसाठी नागरिकांमध्ये हाणामारी होण्याची वेळ यावी, हेच का भाजपचे अच्छे दिन? एका बाजूला सामान्य माणूस भरउन्हात हातातील काम सोडून थेंब-थेंब इंधनासाठी तासनतास रांगेत उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार फक्त इव्हेंटबाजी आणि जाहिरातींमध्ये मग्न आहे! जनतेच्या संयमाचा बांध आता फुटतोय. सत्ताधाऱ्यांनो, अजून किती दिवस सत्य परिस्थिती नाकारणार? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांचा इंधन टंचाई नसल्याचा दावा फेटाळला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारीच राज्यात कुठेही इंधन टंचाई नसल्याचा दावा केला होता. पण विजय वडेट्टीवारांनी प्रत्यक्षात वस्तुस्थिती पूर्णतः वेगळी असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले होते, मुख्यमंत्री कितीही खोटं बोलत असले, तरी महाराष्ट्रातील चित्र इंधन टंचाईची सत्य परिस्थिती सांगणारं आहे. वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळणे अवघड झाले आहे. जर ऐन हंगामात मशागतीची कामं झाली नाहीत, तर पेरण्या वेळेवर होणार नाहीत. पेरण्या लांबल्या तर थेट उत्पादनावर परिणाम होईल. याचा अंतिम फटका संपूर्ण राज्याला आणि देशाला बसेल, बाजारात अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण होईल आणि महागाई गगनाला भिडेल.आज शेतकरी डिझेलसाठी वणवण भटकतोय, उद्या सामान्य जनतेला अन्नधान्यासाठी वणवण भटकावे लागेल. सत्तेच्या धुंदीत राहून वस्तुस्थिती नाकारणं बंद करा. शेतकऱ्यांचे हाल थांबवा आणि तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करा.अन्यथा, टंचाईमुळे उद्भवणाऱ्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे ते म्हणाले होते. रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला
राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन टंचाई आणि महिला अत्याचाराने संपूर्ण राज्य होरपळत असताना, सरकार मात्र कमालीचे असंवेदनशील बनले आहे. राज्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या निरो’ची आठवण येते, अशा अत्यंत तिखट शब्दांत आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर
Source link
परभणीच्या मानवत येथे डिझेलसाठी हाणामारी:'हेच का भाजपचे अच्छे दिन' म्हणत काँग्रेसची सरकारवर टीका; VIDEO व्हायरल