Headlines

परळीत शिंदे गटाच्या माजी तालुकाध्यक्षावर कोयत्याने हल्ला:मोंढा भागात दहशत; मुलाच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती




शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाध्यक्ष आणि दादाहरी वडगावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे यांच्यावर मंगळवार, २६ मे रोजी दुपारी परळीतील मोंढा भागात कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परळी शहरात, विशेषतः मोंढा भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शिवाजी शिंदे हे मोंढा परिसरातील त्यांच्या ‘रिद्धी-सिद्धी’ या हॉटेलवर पत्नीसोबत उपस्थित होते. त्यावेळी काही युवक अचानक हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी शिंदे यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता हल्लेखोरांनी कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात शिंदे यांच्या हाताची बोटे निकामी झाली असून, त्यांच्या पायावर व शरीराच्या इतर भागांवरही गंभीर दुखापत झाली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी वेळीच धाव घेत मध्यस्थी केल्यामुळे शिवाजी शिंदे यांचे प्राण वाचले. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदे यांना तत्काळ परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मुलाच्या वादातून हल्ला या हल्ल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जखमी शिवाजी शिंदे यांनी या घटनेमागील कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, सुरवसे नावाच्या एका मुलाचा आणि माझ्या मुलाचा काहीतरी वाद झाला होता, असे मला समजले. माझी आणि त्या मुलाची कोणतीही ओळख नाही. तरीही तो सोमवारी रात्री माझ्या गावी, दादाहरी वडगाव येथे आला आणि संपूर्ण गावासमोर त्याने मला आणि माझ्या मुलाला अश्लील शिवीगाळ केली. मात्र, त्यावेळी मी त्याची समजूत काढली आणि त्याला परत पाठवून दिले. पत्नीलाही बेदम मारहाण घटनेचा थरार सांगताना शिंदे पुढे म्हणाले, आज दुपारी मी माझ्या ‘रिद्धी-सिद्धी’ हॉटेलवर पत्नीसोबत होतो. त्यावेळी रात्री आलेला तोच मुलगा आणि त्याचे काही साथीदार तिथे आले आणि त्यांनी माझ्यावर थेट कोयत्याने हल्ला चढवला. एकाने माझ्या डोक्यात कोयता घालण्याचा प्रयत्न केला, तो वार मी हातावर झेलल्यामुळे माझ्या हाताची बोटे निकामी झाली. माझ्या हात-पायावर त्यांनी अनेक वार केले. हल्लेखोरांसोबत आणखी तीन जण होते. त्यांनी मला वाचवण्यासाठी आलेल्या माझ्या पत्नीलाही बेदम मारहाण केली. जाताना त्यांनी हॉटेलमधील काही पैसेही लुटून नेले. त्यांचा उद्देश मला मारण्याचा होता की लुटण्याचा, हे मला अद्याप समजलेले नाही. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात आणि हल्लेखोरांना कधी अटक होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *