Headlines

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन:कुटासा-पातोंड्यातील प्रश्नावर काँग्रेस आक्रमक‎




तालुक्यातील कुटासा व पातोंडा परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता कपिल ढोके यांच्या नेतृत्वात एमजेपीचे उपअभियंता निखिल राऊत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून कुटासा व पातोंडा येथील अनेक वॉर्डांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागांमध्ये पाण्याचा दाब कमी आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यावेळी कपिल ढोके यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, ‘पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. तात्काळ सुरळीत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. तिसऱ्या दिवशी हवे पाणी निवेदनात म्हटले आहे की, कुटासा व पातोंडा येथील प्रत्येक वॉर्डात नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भराव्या. नियमित स्वच्छ पाणी मिळावे. आठ / दहा दिवसांवर येणारे नळ दर तिसऱ्या दिवशी यावे. यासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर करणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी कपिल ढोके व सहकाऱ्यांमार्फत करण्यात आली. यावेळी शिवाजी नवले, निखिल उगले, शेखर भाकरे, पवन निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *