![]()
भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी त्यांनी कृषिमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमदार कैलास पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, शेतकरी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ हौसेने घेत नाही. गरज असल्यामुळे तो अर्ज करतो. कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाखो शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने अर्ज केले. मात्र ज्या दिवशी लाभार्थ्यांची लॉटरी जाहीर झाली, त्याच दिवशी त्रुटी पूर्तीसाठी आवश्यक असलेली वेबसाईट बंद होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? वेबसाईट उपलब्ध नसताना त्रुटीची पूर्तता करायची कशी? प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? असा सवाल कैलास पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, अखेर याच कारणावरून तब्बल 94 टक्के अर्ज रद्द करण्यात आले. हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय असून सरकारने स्वतःची चूक शेतकऱ्यांच्या माथी मारली, असा आरोप पाटील यांनी केला आहे. तांत्रिक अडचणींच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडले जातेय कैलास पाटील म्हणाले, सरकार मोठमोठ्या घोषणा करते, जाहिरातींमध्ये योजनांचा गाजावाजा करते; पण प्रत्यक्ष लाभ देण्याची वेळ आली की नियम, अटी आणि तांत्रिक अडचणींच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडते. सरकारने लाखो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्याऐवजी त्यांना पुन्हा संधी द्यावी, त्रुटी पूर्तीसाठी वेबसाईट सुरू करावी आणि पात्र शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचा लाभ द्यावा, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली आहे. कर्जमाफी की कर्जवसूली? दरम्यान, कर्जमाफीवरून देखील कैलास पाटील यांनी टीका केली होती. कर्जमाफी की कर्जवसुली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकारने 2024 पासून कर्जमाफीचा अभ्यास करून 2026 मध्ये घोषणा केली. मात्र अटी-शर्तीच्या जंजाळामुळे ही कर्जमाफी आहे की कर्जवसूली, असा प्रश्न शेतकरी विचारात आहे. सरकारने दिखाऊ घोषणा नव्हे, तर अटी-शर्ती विना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी देखील पाटील यांनी विधानसभेत बोलताना केली आहे.
Source link
प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का?:भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका- कैलास पाटील