![]()
भारतीय जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात घरयादी व घरगणना करण्याच्या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगर तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर, जखणगाव आदी भागांत १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या नेप्ती व परिसरामध्ये जनगणनेचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या कडक उन्हातही प्रगणक म्हणून नियुक्त केलेले शिक्षक घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम करत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी चहा, थंड पाणी आणि अल्पोपहार देऊन शिक्षकांचे आपुलकीने स्वागत केले. नागरिकांशी संवाद साधताना प्रगणक शिक्षक संभाजी कांडेकर यांनी जनगणनेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून देशाच्या भविष्यातील विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, नागरी सुविधा आणि निधी वाटपासाठी ही अचूक माहिती अत्यंत आवश्यक असते. ३४ प्रश्नांच्या आधारे माहितीची नोंद नेप्ती येथील प्रगणक यादी गट क्र. २६१ मध्ये जनगणना प्रगणक शिक्षक बाळासाहेब कड व संभाजी कांडेकर यांनी घरोघरी जाऊन जनगणनेच्या नमुन्यातील ३४ प्रश्नावलीच्या आधारे माहिती संकलित केली. यावेळी कुटुंबातील एकूण सदस्य संख्या, शैक्षणिक स्थिती, रोजगार, निवास व्यवस्था तसेच विविध सामाजिक बाबींची माहिती काळजीपूर्वक नोंदवण्यात आली. यावेळी रामदास फुले, शंकर फुले, जानकाबाई फुले आदी उपस्थित होते.
Source link
नगर तालुक्यात जनगणनेचा श्रीगणेशा; शिक्षकांचे चहा-पाण्याने स्वागत:नेप्तीसह परिसरातील गावांमध्ये घरयादी व घरगणनेसाठी नागरिकांचा प्रतिसाद