Headlines

तरुण आज ना उद्या रस्त्यावर उतरतील:विजय वडेट्टीवार यांचा 'CJP' वरून इशारा; मुख्यमंत्री मुलांच्या मनातील खदखद दूर करतील – मुश्रीफ




काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल बॅन केल्याप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. तरुण रस्त्यावर उतरले तर आपली काय गती होईल अशी भीती सरकारला वाटत आहे. यामुळेच त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल बॅन केले आहे किंवा रोखले आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही देशातील पदवीधर व बेरोजगार तरुणांची मोहीम असल्याचे नमूद केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरुणांच्या मनातील खदखद दूर करतील असा ठाम विश्वासही व्यक्त केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी बेरोजगार तरुणांचा उल्लेख कॉक्रोच अर्थात झुरळ म्हणून केला होता. त्यानंतर अभिजीत दीपके या मराठी तरुणाने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) स्थापन केली आहे. या पार्टीच्या हँडलला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सरकारने या पार्टीचे एक्स हँडल बंद केले आहे. या प्रकरणी तरुणांतून संमीश्र प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. सरकारला आपली गत काय होईल याची भीती – वडेट्टीवार विजय वडेट्टीवार म्हणाले, देशातील तरुण वर्ग कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून व्यवस्थेविरोधातील आपले मत व्यक्त करत आहे. त्यामुळे त्यांचे ट्विटर हँडल बॅन केले जाते किंवा थांबवले जाते. याचा अर्थ असा आहे की, सरकारच्या मनात भीती आहे. तरुण रस्त्यावर उतरला तर आपली काय गत होईल याची भीती सरकारला वाटत आहे. तरुण रस्त्यावर उतरणारच आहेत. आज ना उद्या हे होणारच आहे. त्यामुळे सरकार या देशातील तरुणांचा आवाज दाबू शकणार नाही. मुख्यमंत्री तरुणांच्या मनातील खदखद दूर करतील – मुश्रीफ दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री तरुणांच्या मनातील असंतोष निश्चितपणे दूर करतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. या देशातील अपमानित झालेले जे पदवीधर व बेरोजगार तरुण आहेत, त्यांनी ही मोहीम चालवली आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री अतिशय हुशार आहेत. दूरदृष्टीचे आहेत. या मुलांच्या मनात जी अस्वस्थता आहे किंवा खदखद आहे ती संपवण्याचे काम ते निश्चितपणे करतील असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले. दोन पायाची झुरळे सरकारला सळो की पळो करून सोडतील -राऊत तत्पूर्वी, संजय राऊत यांनीही या प्रकरणी आपले मत व्यक्त केले. कॉक्रोच जनता पार्टीला तरुणांचे मोठे समर्थन मिळत आहे. त्यामुळे सरकार झुरळांना घाबरले आहे. या देशातील झुरळांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळे या झुरळांना मान-सन्मान व लढण्याची जिद्द यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. आता आळशी, बेरोजगार झुरळांना दोन पायांच्या झुरळांना चांगले दिवस येणार आहेत. ही झुरळे या सरकारला सळो की पळो करून सोडतील, असे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी व इंधन टंचाईवरूनही सरकारवर निशाणा दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी व इंधन टंचाईच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा निर्धारच राज्यातील सरकारने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा करून कित्येक महिने उलटले, याबाबत अद्यापही शासन आदेश काढलेला नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात कवडीमोल किंमत मिळत आहे, उत्पादनाचा खर्चही निघत नाही. त्यातच आता पेट्रोल / डिझेलच्या टंचाईमुळे शेतीची मशागत करणे अशक्य झाले आहे. नांगरणी झाली नाही, मशागत झाली नाही तर शेतकरी पिक घेणार कसा. डोक्यावर कर्जाचा डोंगर, घेतलेल्या पिकाला भाव नाही, पुढचं पीक घेण्यासाठी इंधन नाही, खतांचा प्रचंड तुटवडा या सर्व परिस्थितीत शेतकरी भरडला जातोय. या परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते मुख्यमंत्री मात्र सर्व काही छान आहे, इंधनाचा पुरेसा साठा आहे असं सांगताय, सत्य परिस्थिती नाकारण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *