Headlines

संसद रत्न 2026 पुरस्कार जाहीर:डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, स्मिता वाघ यांच्यासह पाच जणांची निवड; जुलैमध्ये दिल्लीत होणार गौरव सोहळा




संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘संसद रत्न’ पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, राज्यातील पाच खासदारांना या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेल्या एकूण १२ खासदारांपैकी ५ खासदार महाराष्ट्रातील आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये लोकसभेतील चार आणि राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे. यात वैयक्तिक श्रेणीमध्ये डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (कल्याण) यांची निवड झाली आहे. त्यांच्यासह नरेश गणपत म्हस्के (ठाणे), डॉ. हेमंत विष्णू सावरा (पालघर), स्मिता उदय वाघ (जळगाव) आणि राज्यसभेतील पुण्याच्या खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये दोन महिला खासदारांचा समावेश असल्याने राज्याच्या स्त्री-शक्तीचाही गौरव झाला आहे. देशभरातील अन्य विजेते देशभरातून या पुरस्कारासाठी एकूण १२ खासदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश), पी.पी. चौधरी (राजस्थान), निशिकांत दुबे (झारखंड), प्रवीण पटेल (उत्तर प्रदेश), विद्युत बरन महतो (झारखंड), लुंबाराम चौधरी (राजस्थान) आणि नरहरी अमीन (गुजरात) यांचा समावेश आहे. या खासदारांची निवड २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत संसदेत केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. चार संसदीय समित्यांचाही सन्मान खासदारांसोबतच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चार संसदीय समित्यांनाही पुरस्कृत करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी समितीचे अध्यक्ष डॉ. चरणजितसिंग चन्नी, वित्त समितीचे अध्यक्ष भर्तृहरी महताब, ग्रामीण विकास आणि पंचायती राज समितीचे अध्यक्ष सप्तगिरी शंकर उलाका, कोळसा आणि खाण समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे. पुरस्काराचा इतिहास आणि निवड प्रक्रिया माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार २०१० मध्ये ‘प्राइम पॉइंट फाऊंडेशन’ने या पुरस्काराची सुरुवात केली होती. या पुरस्काराचे प्रणेते के. श्रीनिवासन यांनी सांगितले की, “निवृत्त घटनात्मक अधिकारी आणि तज्ज्ञांची ज्युरी समिती ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च’ आणि संसदेच्या सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे विजेत्यांची निवड करते.” संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी राहुल यांनी माहिती दिली की, “जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे १६ वा पुरस्कार सोहळा संपन्न होईल. विशेष म्हणजे, यंदा या पुरस्कारांचे १५० वे पुष्प गुंफले जाणार आहे.” नागरी समाजाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार लोकशाही बळकट करणाऱ्या खासदारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *