![]()
खानापूर गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही अशुद्ध असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली. यावेळी गावकऱ्यांनी पाण्याच्या पाईपलाईनमधून निघालेला पक्षी आणि त्याची पंखे थेट बीडीओंसमोर सादर केली. “हाच का तो शुद्ध पाणीपुरवठा?” असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोर्शीजवळ असलेल्या खानापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर अप्पर वर्धा धरण (नळ दमयंती सागर) असूनही, येथील महिला, शेतकरी, मजूर आणि शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. पूर्वी प्रशासनाकडून गावातील शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करून घरोघरी पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे खानापूरवासीयांना सध्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मिळेल तेथून पाणी आणून किंवा पिण्याच्या पाण्याची कॅन विकत घेऊन त्यांना तहान भागवावी लागत आहे. या गंभीर समस्येबाबत माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप भदाडे यांनी खासदार अमरभाऊ काळे यांना माहिती दिली. खासदारांनी लगेच दूरध्वनीवरून बीडीओ यांना माहिती दिल्याने, गटविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय खानापूर येथे दाखल झाले. येथे पोहोचताच गावकऱ्यांनी एकच हल्लाबोल करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खानापूरचा पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा, यापुढे रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी विजय ठाकरे, अन्सार मंन्सुरी, मंगेश बोराळकर, हरी खडसे, दिनेश पानपगार, प्रदीप ठाकरे, योगेश ढोमणे, संतोष तिहीले, तेजस भदाडे, गोकुल ठाकरे यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्धार व्यक्त केला. जर कर भरणाऱ्या जनतेला हक्काचे पाणी मिळत नसेल, तर यापुढे कोणत्याही प्रकारचा कर भरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. दहा-दहा दिवस पाण्याची वाट पाहणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून, विकासाच्या घोषणांऐवजी खानापूरला हक्काचे पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
Source link
खानापुरात अशुद्ध पाणीपुरवठा, ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीत हल्लाबोल:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे बीडीओंसमोर सादर