मुंबईतील जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद थेट दादरपर्यंत पोहोचला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंबई महापालिकेला (BMC) तातडी
.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादर पश्चिमेतील डी. एस. बाबरेकर मार्गावरील पांढरे पट्टे दुपारी 3 वाजेपर्यंत हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा मनसे कार्यकर्ते स्वतः त्या पट्ट्यांवर काळा रंग फासतील, असा इशारा त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर महापालिकेचे अधिकारी थिनर आणि अन्य साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि पट्टे हटवण्याचे काम सुरू केले.
दुसरीकडे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यावर वक्तव्य केले आहे. येथे सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात. या वादामागे कोण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दादरमध्ये स्थानिकांनीही माध्यमांना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या नावावर असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे स्थानिक म्हणाले.
नेमका वाद कशामुळे?
घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आली होती. धार्मिक परंपरेनुसार या पट्टीवरून धर्मगुरूंची वर्दळ व्हावी, या उद्देशाने ती आखण्यात आल्याचे सांगितले गेले.
मात्र, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. सार्वजनिक जागेवर कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यूट्यूबर प्रसाद वेदपाठकने उचलला मुद्दा
या प्रकरणाला सर्वप्रथम मोठी प्रसिद्धी मिळाली ती युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांच्या व्हिडिओमुळे. त्यांनी आपल्या सोसायटी परिसरात काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर आक्षेप घेतला होता.
वेदपाठक यांचा दावा होता की, सोसायटीतील सर्व सदस्यांची परवानगी न घेता हे काम करण्यात आले. धार्मिक श्रद्धांचा आदर असला तरी सार्वजनिक जागेत अशा प्रकारचे वेगळेपण निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या भूमिकेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.
दादरमध्येही आढळले पांढरे पट्टे
घाटकोपरमधील वाद सुरू असतानाच दादर पश्चिमेतील बाबरेकर मार्गावरही अशाच प्रकारचे पांढरे पट्टे रंगवण्यात आल्याचे समोर आले. जैन मंदिराजवळील लेनमध्ये सुरुवातीपासून ते गोकुळधाम इमारतीपर्यंत ही पट्टी काढण्यात आली होती.
याची माहिती समोर येताच मनसेने तीव्र आक्षेप घेतला. संदीप देशपांडे यांनी हे सार्वजनिक रस्त्यांचे खासगीकरण असल्याचा आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली.
मनसेचा आक्रमक पवित्रा
“रस्ते हे सर्वांसाठी आहेत. कोणत्याही धर्मासाठी किंवा समाजासाठी वेगळे चिन्हांकन करणे मान्य होणार नाही,” अशी भूमिका मनसेने घेतली.
देशपांडे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर दादर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मनसे कार्यकर्तेही घटनास्थळी जमा झाले होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून महापालिकेने तातडीने हस्तक्षेप केला.
BMCची तातडीची कारवाई
वाद वाढत असल्याचे लक्षात येताच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पांढरे पट्टे हटवण्याचे काम सुरू केले. थिनर आणि अन्य साहित्याच्या मदतीने रस्त्यावरचे रंग पुसण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.
महापालिकेच्या या कारवाईमुळे मनसेने दिलेला इशारा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सोशल मीडियावरही जोरदार चर्चा
या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर धार्मिक स्वातंत्र्य, सार्वजनिक जागांचा वापर आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका यावर मोठी चर्चा रंगली आहे.
एका बाजूला धार्मिक परंपरा जपण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी स्वतंत्र चिन्हांकन करणे योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
दादर आणि घाटकोपरमधील पट्टे हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी या घटनेमुळे धार्मिक परंपरा आणि सार्वजनिक नियम यांच्यातील समतोलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या घटनांबाबत प्रशासन कोणती स्पष्ट भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातमी वाचा…
मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला:जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरून मनसेचा इशारा, सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही- संदीप देशपांडे

मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरात जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याच्या प्रकारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
घाटकोपर परिसरातील काही रस्त्यांवर आणि सोसायटी परिसरात जैन धर्मगुरू व साध्वी अनवाणी चालताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या कृतीवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून सार्वजनिक जागांवर अशा प्रकारे धार्मिक कारणांसाठी बदल करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सविस्तर बातमी वाचा..
जैनांच्या ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाला नवं वळण:प्रसाद वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड, सोशल मीडियावर संताप

मुंबईतील घाटकोपर परिसरात जैन समाजासाठी सार्वजनिक ठिकाणी काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या मुद्द्यावर सोशल मीडियावर आवाज उठवणारे डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक भावना आणि सार्वजनिक जागांचा वापर या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…