![]()
‘जिल्हाधिकारी एक गाव मुक्काम’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी आशिष येरेवार यांनी तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, शिवणगाव व तिवसा परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून आढावा घेतला. संध्याकाळी मोझरी येथील झेंडा चौक परिसरात आयोजित गावचावडीमध्ये ‘नागरिकांशी हितगुज संवाद’ कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या व प्रलंबित प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री, इतर अवैध व्यवसाय, शेतातील वहिवाट व पांदण रस्त्यांची दुरवस्था, अपुरी स्वच्छता व्यवस्था, विनापरवाना बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर, वीजपुरवठ्यातील अडचणी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात होणारा विलंब याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. अंगणवाड्यांमधून बालकांना वितरित करण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत हा आहार जनावरांनाही खाण्यास योग्य नसल्याचे सांगितले. तसेच गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक सुविधांचा अभाव तसेच मोझरी येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा मुद्दाही नागरिकांनी उपस्थित केला. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेवार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. “प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील,” असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी तहसीलदार मयूर कडसे, सरपंच सुरेंद्र भिवगडे, नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर, आशिष नागरे, कृषी अधिकारी हेमलता इंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील व गावाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Source link
जिल्हाधिकारी एक गाव मुक्काम उपक्रमात मांडल्या सर्व समस्या:निकृष्ट पोषण आहार, पाणीटंचाई, पांदण रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर