![]()
गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाडा आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि. २४ जून) दुपारी जिल्ह्यातील अकोला, कुरणखेड, महान, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. महान परिसरात रात्रीसह बुधवारी सकाळपासून पाऊस : दुसरीकडे, महान आणि परिसरात तब्बल १७ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी रात्रभर पावसाने संततधार लावली होती. त्यानंतर बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह ढगफुटीसदृश मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सलग दोन तास कोसळलेल्या या धुवांधार पावसामुळे संपूर्ण शेतशिवारांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या अतिवृष्टीचा मोठा फटका परिसरातील बागायती शेतीला बसला. अनेक शेतकऱ्यांनी आधीच लागवड केलेले बागायती कपाशीचे पीक या पुरात पूर्णपणे खरडून गेले. शेतांमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणचे शेतीचे बांध फुटले. अगोदरच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट कोसळल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसामुळे महान परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शाळा-महाविद्यालयांचे प्रांगण, काटेपूर्णा वसाहतीसह सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. नाले ओसंडून वाहिल्याने काही वेळ रस्ते वाहतूकही बंद झाली होती. मात्र, या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पुढील ४-५ दिवसांत सोयाबीन, तूर, उडीद आणि मुगाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. कुरणखेड परिसरात दोन तास पाऊस : कुरणखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची उदासीनता निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास दोन तास चाललेल्या वादळी पावसाने संपूर्ण परिसरात अंधकार निर्माण केला होता. या पावसामुळे कुरणखेड परिसरातील खडका, पैलपाडा, ढगा, कोलंबी, मिर्झापूर, तानखेड या गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहिले, तर गावातील नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक दिवसांनंतर आलेल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलांनी रस्त्यावर येऊन पावसात नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. या पावसामुळे आता रखडलेली शेतीची कामे पूर्ण होणार आहे. पेरणीचे योग्य नियोजन करता येईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त मूर्तिजापूर तालुक्यात अमृतधारा; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सातत्यपूर्ण हजेरी लावल्यामुळे नागरिकांना तीव्र गर्मी आणि उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा तीव्र उन्हाळ्यामुळे तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावली होती, अनेक कूपनलिका (बोअरवेल) आटल्याने नागरिकांवर जलसंकट ओढवले होते. त्यातच जून महिना संपत आल्याने सर्वच हवालदिल झाले होते. बाजारपेठेतील गर्दीही ओसरली होती. परंतू, २३ जूनच्या रात्रीपासून सुरू झालेल्या अमृतधारांमुळे आणि २४ जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वातावरणात छान गारवा निर्माण झाला आहे. बाजारपेठेतही नागरिकांची वर्दळ वाढली आहे. शेतकरी आता खरीप पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. करत आहेत. घाईघाईने पेरणी करणे टाळावे जिल्हा कृषी विभागाने शेतकरी बांधवांना आवाहन केले की, पहिल्याच दमदार पावसानंतर लगेच पेरणीची घाई करू नये. जमीन पूर्णपणे ओली होऊन किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाल्याशिवाय सोयाबीन किंवा इतर पिकांची पेरणी करू नये. दुबार पेरणीची संकट ओढवण्याची शक्यता असते.
Source link
महान परिसरात ढगफुटीसदृश पाऊस:कपाशीचे पीक खरडले, जिल्ह्यातील शेतीशिवारात साचले पाणी; बळीराजा सुखावला