राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने झालेला प्
.
प्रवासी विमानाने प्रवास करणे हे एक आदर्श उदाहरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी नुकताच एका प्रवासी विमानाने एकत्र प्रवास केला. यावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. “आमचे आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साद घालत ‘प्रायव्हेट जेट’ऐवजी ‘प्रवासी विमानाने’ प्रवास करणे पसंत केले. मी उद्धव ठाकरेंचेही आभार मानतो की त्यांनीही याला साथ दिली आणि देशाच्या हितासाठी एक आदर्श उदाहरण ठेवले.” “विमानात बसल्यावर चर्चा होतातच, पण त्या कौटुंबिक असू शकतात. प्रत्येक वेळी राजकारणाचीच चर्चा होत नसते. विशेषतः प्रवासी विमानात इतके लोक ऐकणारे असतात, तिथे काय राजकीय चर्चा करणार?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. याच वेळी शिंदे गटात भीतीचे वातावरण असल्याच्या दाव्याचे खंडन करत त्यांनी सांगितले की, “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण गेल्या 30 वर्षांच्या शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून घट्ट बांधलेलो आहोत.”
विश्वास नांगरे पाटलांचे समर्थन- संघाविषयी चांगले बोलले तर चुकीचे काय?
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात संघाची स्तुती केल्याने राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर बावनकुळे यांनी नांगरे पाटलांची पाठराखण केली. “विश्वास नांगरे पाटील यांनी केलेले भाष्य योग्यच आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशाला गौरव मिळवून दिला आहे, तो मजबूत भारताचा कणा आहे. अशा संघाविषयी जर त्यांनी चांगले उद्गार काढले असतील, तर मला वाटते राज ठाकरे किंवा इतर कोणीही त्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही.”
वीर माता, वीर पत्नी आणि वारसदारांना मोठा दिलासा
शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. “शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीर माता आणि कायदेशीर वारसदारांना सरकारकडून शेती कसण्यासाठी जमीन दिली जाते. यापूर्वी या जमिनीच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क (Stamp Duty) लागत असे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल खात्याने हा निर्णय घेतला आहे की, यापुढे वीर माता, वीर पत्नी आणि वारसदारांना जमीन हस्तांतरणावर कोणतेही मुद्रांक शुल्क लागणार नाही. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.”
आरटीओ बदल्यांतील हस्तक्षेप: “उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी होणार”
आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यातील बाह्य हस्तक्षेपाबाबत १०० अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रावर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. “निवृत्त झालेले अधिकारी ‘बजरंग खरमाटे’ आणि इतर काही लोक अद्यापही उच्च पदावर असल्यासारखे वागत आहेत आणि विभागात हस्तक्षेप करत आहेत. मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी वारंवार बोललो आहे. नोकरीवर नसतानाही विभागात हस्तक्षेप करणाऱ्या या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि केंद्र व राज्याच्या उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत याची चौकशी झाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महसूल विभागातील तफावत: भ्रष्टाचार नाही, केवळ ‘तफावत’ आहे
महसूल विभागात आणि ॲडज्युडिकेशन प्रकरणांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले, “ज्या प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क कमी-जास्त केले जाते, तिथे घोटाळा झाला असा याचा अर्थ नाही. ही केवळ ‘तफावत’ आहे. या तफावतीचे ‘अकाउंटंट जनरल’ (AG) मार्फत ऑडिट व्हावे, यासाठी आम्ही एक टास्क फोर्स तयार केला आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील प्रकरणांची चौकशी केली जाईल. आमच्या खात्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, हे देवेंद्र फडणवीसांचे पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार आहे.”
संबंधित बातमी वाचा…
जाहीर स्तुती करायची असेल तर राजीनामा द्या अन् संघात जा!:संघाच्या कार्यक्रमाला गेलेल्या IPS विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंचा घणाघात

नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावत संघाची स्तुती केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसने ‘ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रुल्स’चा (सेवा नियमांचा) दाखला देत आधीच तीव्र आक्षेप नोंदवला होता. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली असून, त्यांनी नांगरे पाटील यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या फडणवीसांवरही सडकून टीका केली आहे. “तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा,” असा थेट सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी