![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देश नक्षलमुक्त केल्यानंतर आता अमली पदार्थमुक्त देशासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारही याबाबत अत्यंत कडक धोरण राबवत आहे. त्यामुळे भाजयुमोने ‘युवा शक्ती जागर’ यात्रेच्या माध्यमातून राज्य नशामुक्त करण्याचा संदेश तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांच्या नेतृत्वाखालील ‘युवा शक्ती जागर यात्रे’चे शुक्रवारी शिर्डीत आगमन झाले. या निमित्त आयोजित युवा मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, सरचिटणीस अशोक पवार, भाजयुमोचे उत्तर जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर यांच्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, देशाच्या सामाजिक व्यवस्थेला पोखरू पाहणारे अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. युवा शक्ती ही बौद्धिक आणि ऊर्जासंपन्न असून, गेल्या काही वर्षांत स्टार्ट-अप, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामध्ये तरुणांना मोठे स्थान मिळाले आहे. आज राज्यात मोठी गुंतवणूक येत असून अहिल्यानगर जिल्हा ‘डिफेन्स’ उद्योगाचे मोठे केंद्र बनत आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतून उभी राहणारी ही उद्योग व्यवस्था देशाचे बलस्थान आहे. केंद्र व राज्य सरकारचे लोककल्याणकारी निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी भाजयुमोवर आहे. सरकारचे काम समाजात सांगण्यात आपण कमी पडलो, की काही शक्ती युवकांमध्ये वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तींना चोख उत्तर द्या, असेही विखे पाटील म्हणाले. राष्ट्रीय विचारांचा प्रवाह रुजवू : महाडीक तरुणांना राष्ट्रीय विचारांच्या प्रवाहात आणतानाच राज्याच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरांची माहिती देणे आणि सरकारच्या विकासकामांचा प्रचार करणे, हाच या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी यांनी केले.
Source link
आपला भारत देश अमली पदार्थमुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा:कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन