![]()
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर सोलापूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे कमालीचा सुखावला आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यात रविवारी दुपारनंतर आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जूनचा शेवटचा आठवडा उजाडला तरी पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावले होते. मात्र, शनिवार पाठोपाठ रविवारीही पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. माळशिरस तालुक्यातील माळखांबी, चांदापुरी, बोरगाव, गिरझणी, निमगाव, माळशिरस, निकमवाडी, खुडूस, दत्तनगर, पिसेवाडी, वेळापूर, चव्हाणवाडी, घुमेरा, मेडद, चाकोरे, जांबूड, मगरवाडी, जळभावी आणि नातेपुते परिसर चिंब झाला आहे. करमाळा तालुक्यातील सालसे, हिसरे, पाथुर्डी, अर्जुननगर फाटा, आवाटी, हिवरे, निमगाव, गौंडरे, नेरले आदी परिसरात मुसळधार पाऊस झाला.
Source link
जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला:आर्द्रा नक्षत्रात बरसल्या सरी; अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात मुसळधार