Headlines

शुभांगी देशपांडे, अनुराधा काळे यांना आगरकर, दाभोलकर पुरस्कार:महाराष्ट्र अंधश्रद्धेत चाचपडतोय, प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन




पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शुभांगी देशपांडे यांना आगरकर स्मृती पुरस्काराने, तर अनुराधा काळे यांना डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी चिंता व्यक्त केली की, आगरकर-दाभोलकरांचा महाराष्ट्र सध्या अंधारात चाचपडत आहे. प्रा. जोशी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात बुवाबाजी वाढली असून बुद्धीप्रामाण्यवादाची उपेक्षा होत आहे. समाजाची विवेकबुद्धी क्षीण होत चालली असून हे वैचारिक अधःपतन चिंताजनक आहे. त्यांनी असेही नमूद केले की, महाराष्ट्रातील संतांचे कार्य मांडताना त्यांचा अध्यात्मवाद आणि निवृत्तीवाद पुढे आणला गेला, परंतु अंधश्रद्धेविषयीचे त्यांचे प्रखर विचार दुर्लक्षित राहिले. हे पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गिताली वि. म. आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीपाल ललवाणी आणि पुणे शहर कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधव उपस्थित होते. प्रा. जोशी यांनी पुढे सांगितले की, कोणतीही परंपरा विशिष्ट काळात उपयुक्त असली तरी ती नेहमीच तशी राहील असे नाही. समाजाने तिची कालबाह्यता ओळखून ती नाकारण्याचे धैर्य दाखवावे. निरुपयोगी परंपरांनी जखडलेल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. ते म्हणाले की, श्रद्धेला विवेक आणि बुद्धीची जोड असेल तर ती जीवनाला समृद्ध करते, पण विवेकशून्य श्रद्धा माणसाला संकटात आणते. स्वातंत्र्यानंतर शिक्षण व्यवस्थेने अनेक विज्ञान पदवीधर तयार केले, पण विज्ञाननिष्ठा रुजवण्यात ती अपयशी ठरली. आपली तीर्थस्थाने श्रीमंतांच्या पापक्षालनाची केंद्रे बनू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी गिताली वि. म. यांनी सांगितले की, सध्याची सामाजिक परिस्थिती कठीण असली तरी सकारात्मक राहून काम करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली आजही स्त्री दुर्लक्षित आहे आणि तिच्यासमोर व्यवस्थेचे मोठे आव्हान आहे. त्या म्हणाल्या की, यातून बाहेर पडण्यासाठी सांस्कृतिक राजकारण करत राजकारणाविषयी सक्रिय आणि सजग असणे महत्त्वाचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करताना स्त्री-पुरुष समानता राखणे गरजेचे आहे. केवळ समाजप्रबोधन पुरेसे नाही, तर आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलून मानसिक धर्म, संस्कार आणि श्रद्धा पुसून टाकत सांस्कृतिक पर्याय देणे अत्यंत आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *