ठाकरे गटातून शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ कायम राहणार असून ‘ऑपरेशन टायगर’ हा शब्द वापरण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला. त्याचवेळी दिल्लीतील जंतरमंतरवरील
.
‘ऑपरेशन टायगर’ सुरूच राहणार, अनेक नेते संपर्कात
‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे. अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदार आणि महाविकास आघाडीतील काही आमदारही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ऑपरेशन वन, टू किंवा थ्रीवर आम्ही थांबणार नाही. पुढेही अनेक राजकीय घडामोडी घडतील, असा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उपरोधिक टीका
दिल्लीतील जंतरमंतरवर सोनम वांगचूक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यावर सामंत यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. “आज आंदोलनाचा सोळावा दिवस आहे आणि त्यांनी फार लवकर पाठिंबा जाहीर केला,” असा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले की, देशातील युवक, शेतकरी, कामगार आणि उद्योजकांसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. त्यामुळेच देशात एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती सरकारला जनतेने पुन्हा सत्ता दिली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. “रामरक्षा आंदोलन, नागपुरातील कार्यक्रम किंवा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांना आता अनेक वर्षांनंतर सुचला आहे. काँग्रेससोबत इतकी वर्षे राहिल्यानंतर त्यांना हिंदुत्वाची आठवण झाली, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे,” अशी टीका त्यांनी केली.
लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना वगळलेले नाही
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळल्याच्या मुद्द्यावर सामंत यांनी सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले की, केवळ वगळलेल्या नावांची चर्चा केली जाते, पण कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे, याकडे कोणी लक्ष देत नाही.
त्यांच्या मते, काही ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते, तर काही पुरुषांनीही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतल्याचे आढळले. अशा आक्षेपार्ह आणि नियमबाह्य अर्जांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पात्र असलेल्या कोणत्याही महिलेला योजनेतून वगळलेले नाही, असा दावा त्यांनी केला.
विनायक राऊत प्रकरणावर बोलण्यास नकार
विनायक राऊत यांच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास सामंत यांनी स्पष्ट नकार दिला. हा त्यांच्या कुटुंबातील विषय असून संबंधितांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर राजकीय भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.
“माझ्यावर आई-वडिलांचे आणि एकनाथ शिंदे यांचे संस्कार आहेत. त्यामुळे कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावून राजकीय फायदा घेण्याची आमची प्रवृत्ती नाही. पोलीस आणि न्यायालय योग्य ती कारवाई करतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कन्हैया कुमार अपरिपक्व; प्रसिद्धीसाठी टीका
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या टीकेबाबत बोलताना सामंत यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. “कन्हैया कुमार अजूनही कुमारच आहे. तो अपरिपक्व आहे. केवळ प्रसिद्धीसाठी आणि ब्रेकिंग न्यूजमध्ये राहण्यासाठी तो वाटेल त्या स्तरावर जाऊन टीका करतो. ही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी पद्धत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
राम मंदिर प्रकरणात न्यायालयावर विश्वास
राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याच्या प्रश्नावर सामंत म्हणाले की, एखादी याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने खुलासा मागवणे ही नियमित न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे त्या विषयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
नागपूर एटीएसच्या कारवाईचे कौतुक
नागपूरमध्ये दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एटीएसने केलेल्या अटकेबाबत सामंत यांनी पोलीस दलाचे कौतुक केले. कोणतीही घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी संशयितांना अटक केली, ही कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या चौकशीतून आणखी माहिती समोर येईल आणि महाराष्ट्र तसेच देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नितेश राणेंच्या वक्तव्यावर सावध भूमिका
भाजप नेते नितेश राणे यांनी अभिनेता आमिर खान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता सामंत यांनी सावध भूमिका घेतली. “तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे. त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र माझी भूमिका स्पष्ट आहे. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याचा राजकीय फायदा घेण्याची आमची भूमिका नाही. जे काही न्यायालयात आहे, त्याचा निर्णय न्यायालय घेईल,” असे त्यांनी सांगितले.
संबंधित बातमी वाचा…
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही?:’कॉकरोच’च्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा; सर्व पक्षांना समर्थनाचे आवाहन, दिल्लीलाही जाण्याची तयारी

“नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही. जंतरमंतरवर सोनम वांगचुक आणि युवक करत असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे,” अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज मांडली. ‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का?:14 ते 15 आमदार फुटण्याचा रामदास आठवलेंचा दावा; पुन्हा होणार ‘ऑपरेशन टायगर’

ठाकरेंची साथ सोडून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी ठाकरे गटातील 14 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी