![]()
गेल्या चार वर्षांपासून कॉरिडॉरबाबत आम्हाला विश्वासात घेणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, एकही आमदार किंवा मंत्री भेट देत नसल्याने आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध केला जाणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांनी दिली. या विषयी येथील पश्चिम द्वार व्यापाऱ्यांनी विशेष बैठक घेत आपला हा आक्रमक निर्णय जाहीर केला. या बैठकीत बोलताना बाबाराव महाजन यांनी सांगितले की, कॉरिडॉरचा आराखडा शासनाने नगरसेवकांना सादर केला आहे. मात्र, या विषयी अद्याप बाधितांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. चार वर्षांपूर्वी या योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर येणारे प्रत्येक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाधितांना विश्वासात घेतले जाणार असल्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, चार वर्षांत हा विश्वास आम्हाला कोठेच दिसला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मंदिर परिसरातील नागरिकांवर यापूर्वी तीन वेळा अन्याय झाला आहे. आता पुन्हा आमच्या घरावर नांगर फिरविण्याची तयारी शासन करत आहे. तसेच एकही लोकप्रतिनिधी संपर्क साधत नसल्याचा खेद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. ^यापुढे आम्ही स्वतःहून कोणाशीही संपर्क साधणार नाही. दशमीच्या दिवशी मुख्यमंत्री पंढरपूर येथे दाखल झाल्यापासून ते एकादशीच्या दिवशी ते शहरातून बाहेर पडेपर्यंत मंदिर परिसरातील सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात येतील. तसेच, दुकानाच्या बाहेर काळे झेंडे लावून शासनाचा निषेध केला जाईल. – बाबाराव महाजन, अध्यक्ष, व्यापारी संघटना दुकानांवर काळे झेंडे
Source link
कॉरिडॉर विरोध:मुख्यमंत्र्यांना आषाढीला दाखवणार काळे झेंडे, मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दिला इशारा