![]()
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीत मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे. या प्रकरणाची सुरुवात एका राजकीय वक्तव्यापासून झाली होती. 7 मे रोजी नितेश राणे यांनी केलेल्या विधानात त्यांनी असा दावा केला होता की, संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांनी 10 जूनपर्यंत हा प्रवेश होईल, असेही स्पष्टपणे सांगितले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, संजय राऊत यांनी हे वक्तव्य आपली सार्वजनिक बदनामी करणारे असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. याचिकेत राऊत यांनी म्हटले होते की, त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी जाणूनबुजून असे विधान करण्यात आले. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. हे प्रकरण माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू होते. दरम्यान, या खटल्याची सुनावणी दुसऱ्या न्यायालयात व्हावी, अशी मागणी करत नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. यानंतर न्यायालयाने दिलेल्या पुढील तारखांना नितेश राणे अनुपस्थित राहिल्याचे नोंदवण्यात आले. सलग दोन वेळा हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेत त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या प्रकरणात नवा वळण आले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी पाहता, संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. यापूर्वीही दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक वेळा जोरदार टीका केली आहे. मे 2023 मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख अपमानास्पद शब्दांत केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्या घटनेनंतरच या मानहानी प्रकरणाची बीजे रोवली गेली होती. दोन्ही नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष दरम्यान, सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना या प्रकारच्या वक्तव्यांमुळे वातावरण अधिक तापले आहे. राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा, त्यावरून निर्माण झालेला वाद आणि आता न्यायालयीन कारवाई यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर स्वरूप आले आहे. पुढील सुनावणीमध्ये काय घडते, तसेच दोन्ही नेते या प्रकरणावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Source link
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट:माझगाव न्यायालयाचा निर्णय; प्रत्यक्ष कोर्टात राहून जामीन घ्यावा लागणार