![]()
अहिल्यानगर तालुक्यातील भातोडी-पारगाव येथे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. तापमानाचा पारा चाळीस अंशावर असताना, गावातील नळ कोरडे असून, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थां
.
“हर घर जल’ या योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा असला, तरी भातोडी पारगावमध्ये महिलांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या दोन वर्षांपासून गावात नियमित पाणीपुरवठा सुरू व्हावा यासाठी सरपंच विक्रम गायकवाड यांनी गावकऱ्यांसह सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही योजना अद्याप अपूर्णच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. कामे तत्काळ सुरू करा, अशी मागणी लावून धरली. ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम आठ दिवसांची मुदत दिली असून, या कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच विक्रम गायकवाड, उपसरपंच राजू पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुभाष कचरे, कैलास गांगर्डे, जालिंदर लबडे, गोविंद लबडे, सिराज पटेल, माजी सरपंच विक्रम लबडे, अजिनाथ शिंदे, सभापती संदीप गुंड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधी जि.प. फोडली, आता टाळे ठोकणार जलजीवन योजनेच्या निकृष्ठ काम केल्या प्रकरणी, यापूर्वी प्रकाश पोटे यांनी १८ जानेवारी २०२४ रोजी जि.प. कार्यालयातील पाणीपुरवठा विभाग कार्यालय फोडले होते. आता त्यांनी भातोडी पाणी योजना आठ दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर जि.प. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.