महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना, “राहुल गांधींना महाराष्ट्राबाबत योग्य माहिती दिली जात नाही. त्यांना चुकीचे ब्रीफिंग मिळत आहे,” असा दावा केला. याचवेळी त्यांनी राज्य सरकारने पेपर
.
‘पेपरफुटीवर सरकारची सर्वात कठोर कारवाई’
राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने या प्रकरणात आजवरची सर्वात गंभीर कारवाई केली आहे. त्यांच्या मते, पेपरफुटीच्या साखळीवर कठोर कारवाई झाल्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.
‘राहुल गांधींना योग्य माहिती दिली जात नाही’
राहुल गांधींना महाराष्ट्रातील घडामोडींविषयी चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप करत बावनकुळे म्हणाले, “त्यांना जर योग्य माहिती हवी असेल तर चांगले ब्रीफिंग करणारे लोक पाठवू.”
दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून बियाणे
पावसाच्या अनियमिततेमुळे किंवा बोगस बियाण्यांमुळे ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे, त्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार, अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा खर्च स्वतः करावा लागणार नाही. जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून शासनच बियाणे उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बोगस बियाणे कंपन्यांवर एफआयआर आणि अटक
बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठी मोहीम सुरू असल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळसह विविध जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातून येणाऱ्या संशयित बियाण्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांना सोडणार नाही
राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात सुरू असलेल्या कारवाईचे स्वागत करत बावनकुळे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले. भेसळयुक्त दूध विकून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
राज्यातील झाडांचे ऑडिट करण्याची गरज
झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांलगतच्या झाडांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑडिट झाले पाहिजे. जुनी आणि धोकादायक झाडे ओळखून त्यांच्यावर वेळेत उपाययोजना करणे आवश्यक असून विकासकामांदरम्यान झाडांचे संरक्षण करण्यासाठीही विशेष यंत्रणा उभारली जाईल, असे त्यांनी सांगितले.
‘ऑपरेशन टायगर’बाबत लोकसभा अध्यक्ष नियमांनुसार निर्णय घेतील
शिवसेना (शिंदे गट) मध्ये सहभागी झालेल्या सहा खासदारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, लोकसभा अध्यक्ष नियमांनुसार योग्य वेळी निर्णय घेतील. एकनाथ शिंदे यांनी कोणतेही पाऊल कायदेशीर सल्ल्याशिवाय उचलले नसल्याचा दावा करत त्यांनी या प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला.
मोहरम मिरवणुकीतील संशयास्पद कॅप्सूल प्रकरणावर भाष्य
मोहरम मिरवणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद कॅप्सूल आणि देशविरोधी कारवायांबाबतच्या चौकशीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, पोलीस अत्यंत गंभीरपणे तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली आधुनिक तपास यंत्रणांच्या मदतीने अशा विघातक प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चेवर मौन
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीएमध्ये येण्याच्या चर्चांबाबत विचारले असता बावनकुळे यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. “या विषयावर शरद पवार, जयंत पाटील किंवा रोहित पवार यांनाच विचारले पाहिजे. माझ्याकडे त्याबाबत कोणतीही माहिती नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी, पोस्टरबाजी किंवा जाहिराती करू नयेत, असे कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्याऐवजी 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शासकीय सेवा शिबिरे आयोजित करून नागरिकांना थेट सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात कमी पाऊस, बोगस बियाण्यांचा वाढता प्रश्न, दुबार पेरणीची वेळ, पेपरफुटी प्रकरण, भेसळयुक्त दूध आणि ‘ऑपरेशन टायगर’मुळे निर्माण झालेले राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर भाजपने सरकारच्या कारवाईचा जोरदार बचाव केला आहे. याचवेळी शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शासनाकडून मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा महत्त्वाचा दिलासा असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
संबंधित बातमी वाचा…
थेट राम मंदिरावर दरोडा, संघाची नाराजी हास्यास्पद:हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘गँग ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकार म्हणत केले लक्ष्य

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी प्रश्न, महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरून राज्य सरकार तसेच भाजपवर जोरदार टीका केली. “राम मंदिरावर थेट दरोडा पडला आहे. केवळ नाराजी व्यक्त करून काही होणार नाही,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थेट लक्ष्य केले. मराठवाड्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी
तुम लढो, हम कपडा संभालते…:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; रामरक्षा आंदोलनाची उडवली खिल्ली

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत सडकून टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला ठाकरे गटाने दिलेल्या पाठिंब्यावरून आणि राज्यात सुरू केलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधक देशात केवळ अराजकता पसरवण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
अयोध्या मंदिर दानपेटी चोरीत 3 कोटींपर्यंत अपहार:कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचा दावा; राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या
अयोध्या राम मंदिरातील दानपेटीतून झालेल्या चोरीप्रकरणी अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, या चोरीत सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंतचा अपहार झाला असावा. मोठ्या प्रमाणात सोने, चांदीचे दागिने आणि रक्कम चोरीला गेल्याचे दावे चुकीचे असून, याबाबत ‘पराचा कावळा’ केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. या चोरीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
