![]()
छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर उभारण्यात येत असलेल्या ४०० खाटांच्या भव्य महिला व बाल रुग्णालयासाठी राज्य सरकारने ३६० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा अधिकृत ठराव जारी केला आहे. या महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णयानंतर, या रुग्णालयासाठी जमिनीपासून ते निधीपर्यंत प्रदीर्घ कायदेशीर आणि राजकीय लढा देणारे शहराचे माजी खासदार आणि माजी आमदार इम्तियाज जलील अत्यंत भावूक झाले आहेत. “मी आता आमदार किंवा खासदार नाही, पण आज माझं मन भरून आलं आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत या लढ्याचा संपूर्ण प्रवास सोशल मीडियावर मांडला आहे. भाजपचे दिवंगत दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी राखीव असलेल्या मोक्याच्या सरकारी जमिनीवर आज हे रुग्णालय उभे राहिले आहे. आता इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्यात. इम्तियाज जलील यांची पोस्ट जशास तशी…. Yes I did it!
मी आता आमदार किंवा खासदार नाही, पण आज माझं मन भरून आलं आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर उभारल्या जाणाऱ्या नवीन ४०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासाठी ३६० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा ठराव जारी केला आहे. हे रुग्णालय अशा जमिनीवर बांधले जात आहे, जी मूळतः गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी वाटप करण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे हे भाजपचे नेते होते, पण एक खरे लोकप्रतिनिधी होते, ज्यांचे माझ्यासकट सर्वजण कौतुक करत असत. जेव्हा मी ते वाटप पाहिले, तेव्हा मी त्याला विरोध केला. मोक्याची सरकारी जमीन अशा स्मारकासाठी वापरली जात होती, ज्याचा फायदा त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त कोणालाही होणार नव्हता. मी त्या निर्णयाविरुद्ध लढलो. मला शिवीगाळ झाली. बीड, आंबेगाव आणि परळी येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला धमक्या दिल्या. केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेवर नियंत्रण असलेल्या सत्ताधारी पक्षांतील राजकारण्यांनी माझी खिल्ली उडवली आणि मी हरणारी लढाई लढत आहे असे मला सांगितले. काहींनी तर माझ्या धर्माचा शस्त्र म्हणून माझ्याविरुद्ध वापर करत आणखी पुढे मजल मारली. एका व्यक्तीने मध्यरात्री फोन करून मला पाकिस्तानात जाऊन तिथे रुग्णालय बांधायला सांगितले. मी शांत राहिलो. मला माझे ध्येय माहित होते २०१४ ते २०१९ या माझ्या आमदारपदाच्या कार्यकाळात, मी महाराष्ट्र विधानसभेत असा युक्तिवाद केला की स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी आपण गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने एक रुग्णालय बांधले पाहिजे. आपली सरकारी रुग्णालये दयनीय अवस्थेत होती. गरिबांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती. पण कोणीही ऐकले नाही. त्यावर चर्चा करायलाही कोणी तयार नव्हते. म्हणून मी एक वेगळा मार्ग निवडला. मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका क्रमांक ९९/२०१७ दाखल केली. शहराला कशाची गरज आहे हे न्यायालयाने समजून घेतले आणि रुग्णालयासाठी स्मारकाची जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. माझे वकील, श्री. शैलेश ब्रह्मे यांनी माझ्याकडून एक रुपयाही घेतला नाही, त्यांचा या कार्यावर विश्वास होता. ते आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यानंतर मी निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला, निविदा काढण्यात आल्या, कामाचे वाटप झाले आणि आता बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. रुग्णालय सुमारे सहा महिन्यांत तयार होईल. माझा नेहमीच विश्वास होता की, हे रुग्णालय आमदार, खासदार किंवा शक्तिशाली राजकारण्यांच्या सेवेत येणार नाही — कारण सरकार आधीच देशातील सर्वोत्तम सुविधांमध्ये त्यांच्या आयुष्यभराच्या उपचारांची सोय करते. हे रुग्णालय गरीब, गरजू आणि ज्यांना खाजगी उपचार परवडत नाहीत अशा सर्वांसाठी उपायोगी ठरेल. मला उद्घटनासाठी कदाचित आमंत्रित केले जाणार नाही. ज्या राजकारण्यांनी माझा विरोध केला होता, त्यांच्याच हस्ते रिबन कापली जाण्याची शक्यता आहे. पण जेव्हा कधी मी जालना रोडवरून जाईन आणि ती भव्य इमारत पाहीन, तेव्हा मी हसेन आणि स्वतःशीच म्हणेन — इम्तियाज, तू करून दाखवलंस. आणि या रुग्णालयाचे नाव गोपीनाथ मुंडे मेमोरियल हॉस्पिटल असे ठेवले जावो. हीच तर नेहमीची कल्पना होती.
Source link
इम्तियाज, तू करून दाखवलंस:मुंडे स्मारकाच्या जागेवर अखेर गरिबांसाठी 400 खाटांचे रुग्णालय; शासन निर्णयानंतर माजी खासदार भावूक