![]()
लासूर स्टेशन वजनापुर येथील शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी विजेच्या समस्यांवर महावितरणविरोधात पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी बुधवारी लासूर स्टेशन येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ३० मेपर्यंत विजेसंबंधित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हल्लाबोल आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. गंगापूर तालुक्यातील गावठाण हद्दीत, शेतशिवारात तुटलेले, वाकलेले विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त न केल्यास हल्लाबोल आंदोलनाबाबत पत्राद्वारे अल्टिमेटम देण्यात आला होता. वाळूज ग्रामीण उपविभाग, गंगापूर उपविभागातील अनेक गावांत विद्युत वाहिन्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. महावितरणने सांगितले की, लाईन स्टाफची बैठक घेऊन गावनिहाय २५ तारखेपर्यंत सर्व मेंटेनन्स कामे केली जातील. विभागीय स्तरावर मेंटेनन्स एजन्सीची बैठक घेऊन तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या जातील. लासूर बाजार समितीतील बैठकीत प्राप्त अर्जावर ३० मेपर्यंत तातडीने कार्यवाही केली जाईल. अधिकाऱ्यांनी विजेची कामे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले.
Source link
गंगापुरातील विजेची कामे महावितरण मार्गी लावणार:पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील रोहित्रे होणार दुरुस्त