Headlines

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पातोंडा गावातील शुद्ध पाणीपुरवठा झाला सुरळीत




अकोट तालुक्यातील पातोंडा गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सलग ४० ते ४५ दिवस नळ कोरडे, दूषित पाणी, महिलांची फरपट आणि ग्रामस्थांचे हाल या गंभीर वास्तवावर प्रकाशित झालेल्या बातमीचा परिणाम दिसून आला आहे. अखेर गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे. पातोंडा गावात सुमारे ६०० लोकवस्ती असून, गाव आधीपासूनच खारपान पट्ट्यात येत असल्याने क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न होता. मात्र, गत काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट झाली होती. गावातील नळ पूर्णपणे कोरडे पडले होते. प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या टँकरमधील पाणीही दूषित व पिवळसर असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अनेकांना शेवाळयुक्त विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली होती. महिलांना भर उन्हात किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. काही नागरिक मजुरी सोडून पाण्यासाठी फिरत होते, तर दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका वाढला होता. ‘मतदानाच्या वेळी गाव आठवते; पण संकटात कोणी फिरकत नाही,’ अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ‘दैनिक दिव्य मराठी’ने गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करत ग्राउंड रिपोर्ट केला होता. प्रशासनाचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील तफावत उघडकीस आणत गावातील महिलांची फरफट, दूषित पाणी आणि ग्रामस्थांचे हाल मांडले होते. अखेर पातोंडा गावात शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून ग्रामस्थांनी समाधान मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *