Headlines

पेरणीपूर्वीच बळीराजा संकटात, डिझेल महागल्याने मशागत खर्चात 20% वाढ:मजूर टंचाई-उसाची एफआरपी न मिळाल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक कात्रीत‎


.

खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या मशागतीचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. जिल्ह्यात आधीच काही कारखानदारांनी उसाची एफआरपीप्रमाणे बिले अदा केलेली नाहीत. त्यातच आता शेतीचा उत्पादन खर्च वाढल्याने आणि उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप पेरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोहोळ तालुक्यात सध्या पावसाळ्यापूर्वी शेती तयार करणे, नांगरणी आणि रोटाव्हेटर मारण्याची कामे जोमाने सुरू आहेत. मात्र, कडक उन्हामुळे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. या मजूर टंचाईमुळे मजुरीचे दरही वाढले आहेत. डिझेल दरवाढीपूर्वी ८ तासांच्या खुरपणीसाठी महिला कामगारांना २५० रुपये दिले जात होते, तो दर आता थेट ३०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. पूर आणि अतिवृष्टीच्या संकटातून सावरत असलेल्या शेतकऱ्याला आता या नव्या महागाईचा सामना करावा लागत आहे.

डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रॅक्टर चालकांनी आपले प्रति एकर दर वाढवले आहेत. ट्रॅक्टर दुरुस्ती, देखभाल आणि इंधन खर्च निघत नसल्याने चालकांसमोर दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र, या इंधन दरवाढीची संपूर्ण झळ थेट शेतकऱ्यांच्या खिशाला बसत आहे. आधीच हक्काचे उसाचे पैसे अडकलेले असताना, आता खरीप पेरणीच्या सुरुवातीलाच बियाणे आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांना उसनवारी किंवा कर्ज काढावे लागत आहे.

दरात वाढ करणे भाग आहे ^डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ट्रॅक्टर चालवण्याचा खर्च वाढल्यामुळे आम्हाला नाईलाजाने मशागतीच्या दरांमध्ये प्रति एकर २०० रुपयांची वाढ करावी लागली आहे. ओंकार कोल्हाळ (चालक, एकुरके)

आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय ^एकतर डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टर मशागत महागली आहे, दुसरीकडे शेतीचा उत्पादन खर्च सतत वाढत आहे. असे असतानाही आमच्या शेती उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने सध्या आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. — सोमनाथ गुंड (शेतकरी, अनगर)

मशागत महागली, खरीप पेरणीचे बजेट कोलमडणार आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोसणाऱ्या मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे बजेट या इंधन दरवाढीमुळे पूर्णपणे कोलमडले आहे. नांगरणीपासून ते पेरणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर प्रति एकर २०० ते ३०० रुपयांचा अतिरिक्त भार वाढल्यामुळे चालू वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत खर्चिक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *