Headlines

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कपटी नेते:राष्ट्रवादीतील घडामोडींवर अंजली दमानियांची टीका, सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचा इशारा




सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. हे दोघेही “अतिशय कपटी नेते” असून पक्षात मोठा राजकीय कट सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, खासदार सुनेत्रा पवार यांनी वेळेत सावध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दमानिया म्हणाल्या की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हालचालींकडे बारकाईने पाहण्याची आवश्यकता आहे. सध्या ज्या प्रकारच्या घडामोडी सुरू आहेत, त्यावरून पक्षांतर्गत काहीतरी मोठा कट रचला जात असल्याचे दिसत आहे. त्यांनी दावा केला की, पक्षातील एका व्यक्तीने निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून पक्षातील झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या घडामोडी स्वतंत्र नसून त्यामागे नियोजनबद्ध रणनीती असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ‘सुनेत्रा पवारांनी सावध व्हावे’ दमानिया म्हणाल्या की, सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात तुलनेने नव्या असल्यामुळे त्यांना या घडामोडींची पूर्ण कल्पना नसावी. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणत्या प्रकारचे राजकीय डावपेच रचले जाऊ शकतात, याचा अंदाज त्यांना येत नसल्याचे दिसते. “हे त्यांना जितक्या लवकर समजेल तितके त्यांच्या दृष्टीने चांगले ठरेल,” असे त्यांनी म्हटले. ‘पक्ष ताब्यात घेण्याचे संकेत’ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींचा उल्लेख करत दमानिया यांनी पक्षावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केवळ अजित पवारांचेच छायाचित्र बॅनरवर लावण्याच्या सूचनांबाबतही त्यांनी भाष्य केले. या घडामोडींवरून सुनेत्रा पवार यांनी हे “रेड फ्लॅग” म्हणून पाहण्याची गरज आहे. पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चिन्हे दिसत असून त्यांनी वेळेत सावध होणे आवश्यक असल्याचे दमानिया म्हणाल्या. दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या या दाव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या आरोपांवर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर सरकारवर टीका दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाबाबतही अंजली दमानिया यांनी केंद्र सरकारवर टीका केली. वांगचूक यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असूनही एनडीएतील एकाही वरिष्ठ नेत्याने त्यांची भेट घेतली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. दमानिया म्हणाल्या की, त्या स्वतः दिल्लीला जाऊन वांगचूक यांची भेट घेऊन आल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचे शुगर लेव्हल कमी झाले आहे, ईसीजीमध्ये अनियमितता दिसत आहे आणि शरीरातील इतर वैद्यकीय मापदंडही बिघडले आहेत. “एवढ्या दिवसांच्या उपोषणानंतरही सरकारकडून कोणतीही संवेदनशील भूमिका दिसत नाही, हे दुर्दैवी आहे,” असे त्या म्हणाल्या. विनायक राऊत प्रकरणात तातडीच्या कारवाईची मागणी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधातील प्रकरणावरही दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्यावरील गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने अटक व्हायला हवी होती, मात्र त्यात झालेला विलंब संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. “सामान्य नागरिक असता तर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती. मग या प्रकरणात विलंब का झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक पुण्यातील निकृष्ट दर्जाच्या वस्तू विक्रीप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईचे दमानिया यांनी स्वागत केले. निकृष्ट दर्जाचे साहित्य विकून पैसे कमावणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, अंजली दमानिया यांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण, सोनम वांगचूक यांच्या उपोषणाकडे सरकारची भूमिका आणि विविध राजकीय घडामोडींवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *