![]()
जिल्हयात पावसाने उघडीप दिल्याने आता कोवळी पिके माना टाकू लागली असून पुढील चार दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. तर दुसरीकडे सेनगाव येथे पावसासाठी धोंडी धोंडी पाणी दे चा गजर घुमू लागला आहे. हिंगोली जिल्हयात खरीप हंगामात 4.10 लाख हेक्टरपैकी 3.10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस व जुले महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावासनंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मुग, ज्वारी या पिकांचा समावेश असून हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यात बऱ्यापैकी हळद लागवड झाली आहे. दरम्यान, सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांसह इतर पिके वाऱ्यावर डोलू लागली आहेत. मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून आता कोवळी पिके माना टाकू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी तुषार सिंचन पध्दतीने पिकांना पाणी देण्यास सुरवात केली आहे. मात्र माळरानाच्या जमीनीवरील पिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. पिके माना टाकत असल्याने शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. सेनगाव तालुक्यात काही तरुणांनी पावसासाठी साकडे घातले असून गुरुवारी ता. 16 सकाळी धोंडी धोंडी पाणी दे चा गरज प्रत्येक गल्लीमध्ये घुमला आहे. धोंडीवर पाणी टाकल्यानंतर पाऊस पडतो अशी भावना आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकच धोंडीवर पाणी टाकून पावसासाठी साकडे घालत असल्याचे चित्र सेनगाव शहरात होते. आता पाऊस कधी पडणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांसह नागरीकांनाही लागली आहे.
Source link
हिंगोलीत बळीराजा चिंतेत:10 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने 'धोंडी धोंडी पाणी दे' च्या गजरात तरुणांचे वरुणराजाला साकडे